मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर यापूर्वी अनेक दिग्गज बसले आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांनी केलेले काम हे पुढील काळात लक्षात राहील, राज्यातील साडेबारा कोटी जनतेला न्याय देण्यासाठी अजित पवार काम करतील, असा विश्वास आज विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
अजित पवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर सभागृहात त्यांच्या अभिनंदनपर प्रस्तावावर ते बोलत होते. अजित पवार यांचा स्वभाव रोखठोक आणि स्पष्ट असल्याने सभागृहातील चुकीच्या गोष्टी व शासनाकडून राहिलेल्या त्रुटींवर समर्थपणे बोट ठेवण्याचे काम अजित पवार करतील, असे जयंत पाटील म्हणाले.
एखादा निर्णय त्वरित घ्यायचा असताना 30-35 वर्षांचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव उपयोगी पडेल. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पद भूषविले आहे. तसेच अर्थमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. प्रत्येक खात्यातील बारकावे समजण्यात त्यांना यामुळे अधिक सुलभता येणार आहे. त्यामुळे सरकारच्या बाजूने विषय मांडले जात असताना अजित पवार विरोधी पक्षाची बाजू अतिशय समर्थपणे मांडतील, असे जयंत पाटील म्हणाले.
नवीन सरकार राज्यातील जनतेसाठी जे-जे चांगले काम करेल त्याला अजित पवारांचे सहकार्य नक्कीच लाभेल. त्याप्रमाणेच कणखर विरोधी पक्ष नेता म्हणून विरोधी पक्षांच्यावतीने सरकारकडे मागण्या मांडण्याचे काम आणि सोबत योग्य मार्गदर्शन करण्याचे काम अजित पवार निश्चित करतील असे बोलत जयंत पाटील यांनी पक्षाच्यावतीने अजित पवार यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.