Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (एनसीपी) प्रमुख नेते अजित पवार यांचे आज सकाळी बारामतीजवळील विमान अपघातात दुःखद निधन झाले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला जात असताना हे विमान लँडिंगदरम्यान क्रॅश झाले. या अपघातात अजित पवारांसह विमानातील इतर चार जणांचाही मृत्यू झाला. DGCAने याची पुष्टी केली असून, अपघाताची सखोल चौकशी सुरू झाली आहे. अपघाताचा घटनाक्रम अजित पवार मुंबईहून सकाळी सुमारे ८.१० वाजता खासगी चार्टर्ड Learjet 45 विमानाने (रजिस्ट्रेशन VT-SSK, VSR कंपनीचे) बारामतीकडे निघाले होते. हे विमान बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत होते, जिथे सकाळी दाट धुके होते. बारामती हे छोटे विमानतळ असून, त्याची धावपट्टी Table Top Runway प्रकारची आहे. येथे ILS (Instrument Landing System) सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे पायलटला मॅन्युअल पद्धतीने लँडिंग करावे लागते. एक्सपर्ट्स आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार: – पहिल्या लँडिंग प्रयत्नात विमान धावपट्टी दिसत नसल्याने अयशस्वी ठरले आणि ते पुन्हा आकाशात झेपावले. – दुसऱ्यांदा घिरटी घालून धावपट्टीचा अंदाज घेऊन लँडिंगचा प्रयत्न केला. – मात्र, विमान धावपट्टीवर थेट जाण्याऐवजी बाजूला गेले. जमीनीपासून सुमारे १०० फूट अंतरावर असताना विमानाचे संतुलन बिघडले. – पायलटने MAYDAY कॉल केला होता. – विमान धावपट्टीवर पोहोचण्याआधीच जमिनीला धडकले, त्यानंतर ४-५ मोठे स्फोट झाले आणि विमानाला भीषण आग लागली. विमान पूर्णपणे जळून खाक झाले. – अपघात सकाळी सुमारे ८.४५ ते ८.५० च्या दरम्यान घडला. स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली, पण आगीच्या ज्वाळांमुळे कुणालाही वाचवता आले नाही. विमानात कोण-कोण होते? 1. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार 2. पीएसओ (पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर) HC विदीप जाधव 3. पायलट कॅप्टन सुमित कपूर 4. कॅप्टन संभवी पाठक (फर्स्ट ऑफिसर) 5. पिंकी माळी (फ्लाइट अटेंडंट) वकिलाचा खळबळजनक दावा मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करणारे ॲड. नितीन सातपुते यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत अपघात संशयास्पद असल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटले “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात संशयास्पद आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि मानवाधिकार आयोगामार्फत याची चौकशी होणे आवश्यक आहे. विमान जाणूनबुजून सदोष ठेवले गेले की खरंच तांत्रिक बिघाड होता की राजकीय कट होता? याची CBIमार्फत चौकशी व्हायला हवी.” त्यांनी विमान सदोष ठेवले गेले असण्याची शक्यता व्यक्त केली असून, स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. मात्र, अधिकृत तपासात अद्याप कोणताही राजकीय कट किंवा साजेशी कारवाईचा पुरावा समोर आलेला नाही.