थोड्या दिवसांनी शिवसेना देखील ‘तेच’ चालवतील – अविनाश जाधव
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात आज मोर्चा काढला. मात्र, मनसेचा हा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप शिवसेनेने केला. त्यानंतर आता मनसेने शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार हे सरकार चालवत असून थोड्या दिवसांनी शिवसेना देखील चालवतील, अशी खोचक टीका मनसे नेते अविनाश जाधव यांनी शिवसेनेवर केली आहे.
अविनाश जाधव म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा गळा घोटला आहे. सत्तेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत समझोता केलेला आहे. सध्या शिवसेना नाही, तर अजित पवार सरकार चालवत आहेत. थोड्या दिवसांनी शिवसेना देखील ते चालवतील, राज्य सरकार अजित पवार पुरस्कृत आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच, बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार राज ठाकरे आहेत, असेही ते म्हणाले. दरम्यान, पुढील काळात मनसेविरुद्ध शिवसेना असा वाद चिघळण्याची शक्यता आहे.