मुंबई – मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तेव्हा त्यांनी स्वत: मीडिया समोर येऊन राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षामध्येच राहणार असल्याचे स्पष्ट करत चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासंदर्भात मोठा दावा केला आहे. ‘केसेस काढून घेण्यासाठी अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाला’, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. सध्या त्यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?
‘अजित पवार यांनी त्यांच्यावरच्या केसेस काढून घेण्यासाठी शपथविधी करुन घेतला. आपल्या केसेस विथड्रॉ केल्या. केसेस काढून घेतल्यानंतर सरकारमधून बाहेर पडले आणि पुन्हा एनसीपीमध्ये गेले’. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली. “राष्ट्रवादी आधी शाहू, फुले, आंबेडकरवादी म्हणत होते आणि आता भाजपसोबत बसत असतील तर त्यांनी इतकी वर्ष फसवलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सरड्यासारखा रंग बदलत आहे. पूर्वी शाहू, फुले, आंबेडकरवाद्यांचा कलर होता, आता भाजप शिवसेनेचा कलर होत आहे की काय अशी चर्चा सुरु झाली.”
महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेबाबतही प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही आधीच स्पष्ट केलं आहे की महाविकास आघाडीसोबत आमचा काही समझौता नाही, संबंध नाही. काँग्रेस आणि एनसीपीने जाहीर केलं आहे की आम्ही वंचित बहुजन आघाडीसोबत समझौता करु शकत नाही, त्यामुळे त्या सभेचा आणि आमचा काही संबंध नाही,” असे विधान प्रकाश आंबेडकर केले.
बारसू रिफायनरीला आमचा विरोध
बारसू रिफायनरीबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले, “बारसू रिफायनरीला आमचा विरोध आहे. एन्रॉनलाही आमचा विरोध होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणाची वाट लावू नये. राज्यातील नेते केंद्रातून फोन आल्यावर त्यांच्या भूमिका बदलतात. नंतर म्हणतात ही भूमिका आमची नाही. मुळात कोकण हे लाईफ सेंटर आहे. कोकणात 95 टक्के ऑक्सिजन आहे इंडस्ट्री येऊन कोकणात रोजंदारी वाढेल असं नाही, तर कोकणातील नैसर्गिक संपत्तीचं प्लॅनिंग करुन व्यापार, छोटे उद्योग सुरु केले, तर तेलंगणाप्रमाणे कोकणातही लोकांचं उत्पन्न वाढेल,” असा सल्लाही प्रकाश आंबेडकरांनी दिला.