कोल्हापूर – महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न हा सध्या न्यायालयात आहे. अशात कर्नाटक सरकारकडून आलेली विधाने योग्य नव्हती. याप्रकरणी सर्वात चांगले वकील लावावेत अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे स्पष्ट मत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. कोल्हापुरात बोलत असताना अजित पवार यांनी सीमा प्रश्नावरून सुरु असलेल्या वादावर भाष्य केले.
वाहन कर्नाटकात गेल्यानंतर तोडफोड करायची, वेगळ्या पद्धतीचे राजकारण करायचे, आम्हालाही भावना आहेत ना असही अजित पवार यावेळी म्हणाले. प्रत्येकाला एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याचा अधिकार आहे. एक इंच देखील जमीन देणार नाही असं म्हणणारे तुम्ही कोण ? सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावर तुम्ही काय करणार असा सवाल देखील अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला.
कर्नाटकाने मुंबईवर देखील दावा केला होता त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले,कर्नाटक म्हणते मुंबई आमची आहे यांच्या काकांनी ठेवली मुंबई,मुंबई ही महाराष्ट्राची आहे. यासाठी १०६ जणांनी हौतात्म पत्करले आहे अशी उद्विग्न प्रतिक्रिया देखील यावेळी अजित पवार यांनी दिली. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांची बैठक घ्यावी,कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री बेताल वक्तव्य करताहेत हा सर्व प्रकार सभागृहात सर्वांसमोर मांडला असल्याची आठवण देखील यावेळी अजित पवार यांनी करून दिली.