Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्राच्या राजकारणात एका मोठ्या नेत्याच्या जाण्याने शोककळा पसरली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचा बुधवार सकाळी बारामतीजवळ विमान अपघातात मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील इतर चार जणांचाही मृत्यू झाला असून, राज्य सरकारने तीन दिवसांचा राजकीय दुखवटा घोषित केला आहे. अपघात कसा घडला? अजित पवार (Ajit Pawar)मुंबईहून बारामतीकडे खासगी चार्टर्ड विमानाने (Learjet 45) प्रवास करत होते. हे विमान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रचारासाठी निघाले होते. बारामती विमानतळावर लँडिंगच्या प्रयत्नात विमान रनवेपासून बाजूला गेले आणि शेतात कोसळले. यानंतर विमानाला भीषण आग लागली आणि ते पूर्णपणे जळून खाक झाले. अपघात सकाळी सुमारे ८.४५ ते ८.५० च्या सुमारास घडला. विमानात अजित पवार यांच्यासह त्यांचा पीएसओ, एक अटेंडंट आणि दोन क्रू मेंबर्स (पायलट आणि फर्स्ट ऑफिसर) होते. DGCAच्या माहितीनुसार, विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या हेलिकॉप्टर प्रवासातील थरारक किस्सा महाराष्ट्राच्या राजकारणात सतत दौऱ्यावर असणारे अजित पवार यांना हेलिकॉप्टर प्रवासाचा अनुभव होता. जुलै २०२४ मध्ये गडचिरोली दौऱ्यादरम्यान त्यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात हा थरारक किस्सा सांगितला होता. नागपूरहून गडचिरोलीकडे हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर गडचिरोलीजवळ दाट ढग जमा झाले. हेलिकॉप्टर ढगांच्या गर्दीत शिरले आणि जोरदार हेलकावे बसू लागले. अजित पवार म्हणाले होते, “हेलिकॉप्टर ढगात शिरताच माझ्या पोटात गोळा आला. सगळेच थोडेसे घाबरले होते.” या वेळी त्यांच्यासोबत असलेले तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र पूर्णपणे शांत होते. अजित पवारांनी फडणवीसांना विचारले असता ते म्हणाले, “घाबरू नका, माझे आतापर्यंत सहा अपघात झालेत, पण मला कधीच काही झालं नाही. मी हेलिकॉप्टरमध्ये असलो की काही होत नाही.” फडणवीसांच्या या आत्मविश्वासपूर्ण उत्तराने वातावरण हलके झाले आणि हेलिकॉप्टर सुखरूप लँड झाले. हा किस्सा सांगताना अजित पवारांनी गंमतीने म्हटले होते, “ही त्यांच्या पूर्वजांची पुण्याई असावी.” यामुळे उपस्थित प्रेक्षक हसले होते. राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, शरद पवार यांसह अनेक नेत्यांनी या दुर्घटनेत शोक व्यक्त केला आहे. राज्य सरकारने अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.