मांडवगण फराटा येथे ऍड. अशोक पवार यांच्या प्रचारार्थ सभा
न्हावरे – भाजपाने त्यांच्या निष्ठावंतांची गय केली नाही. त्यांना घरी बसवले. तर, राष्ट्रवादीतून गेलेल्या जितरबांची काय गय करणार, अशी खिल्ली राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुर-हवेलीमधून राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेल्या स्वयंघोषित नेत्यांची उडवली.
शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार ऍड. अशोक पवार यांच्या प्रचारार्थ मांडवगण फराटा(ता. शिरुर) येथे झालेल्या सभेत पवार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या सभापती सुजाता पवार, शिरूर बाजार समितीचे उपसभापती विश्वास ढमढेरे, राष्ट्रवादी युवक प्रदेशचे सरचिटणीस प्रदीप कंद, राष्ट्रवादीचे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, शिरूर तालुका अध्यक्ष रवींद्र काळे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, जिल्हा बॅंकेच्या संचालिका डॉ. वर्षा शिवले, जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब ढमढेरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, पंचायत समितीच्या उपसभापती जयमाला जकाते, शिरूर पंचयात समितीच्या सदस्या राणी शेंडगे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सगरराजे निंबाळकर, बाळासाहेब नागवडे, वैभव यादव, संचालक काकासाहेब कोरेकर, मंदा सरके, उद्योजक भाऊसाहेब महाडीक, लोणीकंदचे सरपंच सागर गायकवाड, पी. के. गव्हाणे, मांडवगणचे सरपंच शिवाजी कदम, पंडीत दरेकर, कुंडलिक शितोळे आदी मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या जितरबा केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी व स्वतःचे काळे धंदे वाचवण्यासाठी पक्ष सोडून गेलेले आहेत. तसेच शेतकरी विरोधी सरकार म्हणून देशात व राज्यात भाजपा सरकारची ओळख बनली आहे. परंतू, आताची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक आहे. या निवडणुकीत महाराष्ट्राच्या विकासाचे मुद्दे असावेत. इतर मुद्दे काय कामाचे? राज्यावर सध्या सर्वाधिक कर्ज आहे.राज्याला कंगाल करण्याचे काम युती शासन करत आहे. आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास तीन महिन्यांत सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
आमदार पाचर्णे यांना चासकमान डाव्या कालव्याची गळती थांबवण्यासाठी पाच वर्षांत एक रुपयांचाही निधी आणता आलेला नाही. निष्क्रिय आमदार म्हणून पाचर्णे प्रसिद्ध आहेत. ते केवळ विकासाच्या गप्पा मारतात.
– ऍड. अशोक पवार, माजी आमदार