मुंबई – जो लाट निर्माण करण्यात यशस्वी होतो तो जिंकतो, अशी परिस्थिती आजच्या निवडणुकांबाबत झाल्याचं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. एका वृत्तापत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
राज ठाकरे यांनी यावेळी नाशिक महानगर पालिकेत झालेल्या पराभवाविषयी मत व्यक्त केलं. केवळ विकासाकामांवर निवडणूक जिंकता येत नाही. ज्याला लाट निर्माण करता येते, तोच निवडणुकीत यशस्वी होतो, असं राज यांनी म्हटलं.
यावेळी राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत झालेल्या पराभवावर भा।य केलं. ते म्हणाले की, अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये खूप काम केलं पण नशिबी पराभवच आला. समाजाने काम केलं तर शाबासकी द्यावी, काम करत नसेल त्याला बाजूला करावं. चांगलं काम केलं तर शाबासकी आणि भ्रष्टाचार केला तर शिक्षा होत नाही, तोपर्यंत सुधारणा होणार नाही. मात्र आपण आशावादी असल्याचं राज यांनी नमूद केलं.
राज ठाकरे यांनी नाशिक महापालिकेत सत्ता असताना केलेल्या कामाविषयी सांगितलं. नाशिक महापालिकेत मनसेच्या सत्ता काळात भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. नाशिकचा पाण्याचा प्रश्न आम्ही कायमचा मिटवला. नाशिकमधील रस्ते आम्ही चांगले केले. पावसाळ्यात मुंबई, पुण्यातील रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले पण नाशिकमध्ये पत्रकारांना खड्डे मिळाले नाहीत. नाशिकमध्ये विकासकामं केली. हे चांगलं आहे की वाईट ? लोकांनी साथ दिली तर हुरुप येतो. लोकांना नेमकं काय हवं आहे ? इतरांसाखरंच वागायचं का? असे प्रश्न राज ठाकरे यांनी मुलाखतीत उपस्थित केले.