Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यासह संपूर्ण देश हळहळला आहे. देशभरातून त्यांच्या निधनाबद्दल शोकव्यक्त करण्यात येत आहे. अजित पवारांचे अचानक निघून जाणे कुणालाही रुचलेले नाही. राजकारण असो किंवा इतर विषय असोत, अजित पवार बेधडक विधाने करत असत. अनेकदा त्यांना आपल्या विधानांमुळे अडचणींचाही सामना करावा लागला. मात्र त्यांच्या एका मिश्किल विधानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अजित पवार यांच्या या विधानाचा व्हिडीओ एका मराठी वृत्तवाहिनीने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. ९ जानेवारी २०२६ रोजी महानगरपालिकेच्या प्रचारादरम्यान एकेठिकाणी बोलत असताना अजित पवार यांनी पायलटच्या निरोपाबाबत विधान केले होते. Ajit Pawar Death : “वैमानिकाचा निरोप आला की जावे लागेल…”, असे सांगून अजित पवार घाईत जायचे असल्याबाबत सांगत होते. त्यांच्या या वाक्यामुळे आता अनेकांचे डोळे भरून येत आहेत. अजित पवार नेमके काय म्हणाले होते? काही सेकंदाच्या या क्लिपमध्ये अजित पवार कार्यकर्त्यांच्या गराड्यात घाईत असल्याचे दिसत आहेत. काही जण त्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासंदर्भात सांगतात. यावेळी अजित पवार , “वैमानिकाचा निरोप आला किंवा उशीर झाला तर मला निघून जावे लागते.” असं म्हणताना दिसत आहेत. त्यांच्या या विधानाचा आणि आज झालेल्या त्यांच्या विमान अपघाताचा प्रसंग आठवून लोक भावुक होत आहेत. अजित पवार हे व्हीएसआर कंपनीच्या खासगी विमानाने बारामती येथे मुंबईहून येत होते. विमानातील एकूण पाच प्रवाशांची नावे समोर आली आहेत. Ajit Pawar Death : अजित पवार यांच्यासह मुंबई पीएसओ विदीप जाधव, वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी असल्याची माहिती समोर आली. मुंबईतून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी टेकऑफ घेतले होते. तर बारामतीमध्ये ८ वाजून ५० मिनिटांनी लँडिंग होणार होते. मात्र विमान लँड होत असतानाच अचानक हा अपघात झाला आणि त्यात अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला.