मुंबई – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेमध्ये २०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी त्यावर सडकून टीका करताना अर्थसंकल्पामध्ये यावेळीही महाराष्ट्रावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली. तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्पाची पाठराखण केली आहे.
अशातच आता राष्टवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावरून दिलेल्या प्रतिक्रियेवर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अर्थसंकल्प सादर केल्यानंतर फडणवीस यांनी याबाबत भाष्य करताना अर्थसंकल्पाचे तोंडभरून कौतुक केले होते. यावेळी बोलताना त्यांनी, नाशिक व नागपूरकरांचं मेट्रोबद्दल अभिनंदन केलं. फडणवीसांच्या याच वक्तव्यावर अजित पवार यांनी खोचक टीका केली.
काय म्हणाले अजित पवार?
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, “विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना नाशिक आणि नागपूरकरांचं अभिनंदन केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं अभिनंदन करण्याची हिंमत त्यांनाही झाली नाही, कारण अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काहीही नाही, याची जाणीव त्यांनाही झाली आहे. त्याची अप्रत्यक्ष कबूली त्यांनीच केवळ नाशिक व नागपूर मेट्रोबद्दल अभिनंदन करुन दिली आहे. फडणवीस साहेबांच्या या एवढ्या प्रामाणिकपणाबद्दल मात्र, मी त्यांचं अभिनंदन करतो.” अशी खोचक टीका केली.
तरतूद अर्थसंकल्पाच्या पानांवरुन प्रत्यक्षात उतरणंही तितकंच महत्वाचं
आज केवळ अर्थसंकल्प मांडला गेला आहे. तो मंजूर होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी आवश्यक सुधारणा सूचवून महाराष्ट्रावरचा अन्याय दूर करावा, महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असं माझं आवाहन आहे. मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटींची तरतूद स्वागतार्ह आहे, ही तरतूद अर्थसंकल्पाच्या पानांवरुन प्रत्यक्षात उतरणंही तितकंच महत्वाचं आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
अकार्यक्षमता लपवण्याची सोय
नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर, नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे, कारण येथील निवडणुका लवकरच अपेक्षीत आहेत. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग, नाशिक-पुणे, कराड-चिपळूण रेल्वेमार्गासाठी तरतूद केल्याचे या घडीला तरी दिसून येत नाही. रेल्वे अर्थसंकल्प आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प एकत्रित करुन, केंद्रानं आपलं अपयश, अकार्यक्षमता लपवण्याची सोय आधीच करुन ठेवली आहे, असा आरोपही उपमुख्यमंत्र्यांनी केला.