सासवड – पुरंदर-हवेलीचा विकास करण्याची धमक फक्त संजय जगताप यांच्यात आहे. यासाठी जगताप यांच्या रुपाने खणखणीत नाणे दिले आहे. जगताप यांना पुरंदर-हवेलीच्या विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्यासाठी माझ्याबरोबर विधानसभेत पाठवा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
सासवड येथील पालखी तळावर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार संजय जगताप यांच्या प्रचारार्थ सांगता सभा झाली. त्यावेळी अजित पवार बोलत होते. पवार म्हणाले की, विजय शिवतारे यांना निवडणूक आल्यावरच गुंजवणीचे पाणी आठवते. मात्र, हे पाणी आणण्याची त्यांच्यात धमक नाही. आता ते आजारी असल्याची नौटंकी करीत असून, भावनिक करून मते मागतील.
5 वर्षांत यांना पाणी, रोजगार आणि अन्य कोणतेही काम पूर्ण करता आले नाही. स्वाभिमानी पुरंदरला दोनशे कोटींच्या भ्रष्टाचाराचा कलंक लावणाऱ्याला हद्दपार करण्याचे आवाहन संजय जगताप
यांनी केले.
भ्रमणध्वनीद्वारे शरद पवारांचा संदेश…
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांना आम्ही सर्वांनी एक विचाराने उमेदवारी दिलेली आहे. प्रचारासाठी येण्याची माझी इच्छा होती. परंतु, पावसामुळे मी आपल्यापर्यंत पोहचू शकलो नाही. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांना खाली खेचावे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.