तालुक्यात एक महिन्यांपासून सेवा विस्कळीत
वेल्हे- अतिदुर्गम वेल्हे तालुक्यात आयडिया कंपनीची नेटवर्क सेवा विस्कळीत झाली असून एक महिन्यांपासून या भागातील कंपनीचे ग्राहक हैराण झाले आहेत. फोन न लागणे, इंटरनेट बंद पडणे, वारंवार रेंज जाणे आदी प्रकार घडत असून महत्त्वाच्या वेळी फोन लागत नसल्याने अनेकांनी आपली सिमकार्ड अन्य कंपनीत पोर्ट करण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी या परिसरातील ग्राहक करीत आहेत.
केंद्र सरकाराने डिजीटल इंडियाच्या धर्तीवर अनेक सुविधा ऑनलाइन केल्या आहेत. परंतु, या सुविधांचा फायदा घेता येत नाही. तालुक्यात आयडीया कंपनी चांगली सेवा देत होती. त्यामुळे प्रत्येक वेल्हेकरांकडे आयडीयाचे सिम होते. सध्या, प्रत्येक कंपनीने आपले कॉलरेट भरमसाट वाढविले आहेत. दाम जादा घेत आहेत मात्र सेवा शुन्य देत असल्याने ग्राहकांची मोठी अडचण करून ठेवली आहे. अति दुर्गम वेल्हे तालुक्यातील नगरिकांना नेहमी कोणत्याना कोणत्या समस्या नेहमी भेडसावत असतात. मात्र, संबधित विभाग याकडे नेहमी दुर्लक्ष करीत असते. पुर्वी ऑनलाइन व्यवहार होत नव्हते; त्यामुळे इंटरनेट सारख्या सुविधा मिळाल्या नाही तरी याचा काही फरक पडत नव्हता; परंतु, बदलत्या काळात इंटरनेट ही काळाची गरज होऊन बसली आहे. यामुळे आयडीया कंपनीने सेवा सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.