राष्ट्रवादीच्या सभांमध्ये आता दोन झेंडे फडकणार
परभणी – राज्य सहकारी बॅंक घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यावर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. निवडणुका जवळ आल्या की असे आदेश, नोटीस निघतात. मी राज्य सहकारी बॅंकेचा संचालक होतो. मात्र निर्णय माझे नव्हते. आम्ही कायद्यात राहूनच काम केले. आम्ही न्यायालयाचा आदर करतो. मात्र गुन्हा दाखल करण्याची गरज नसताना हे झाले आहे, असेही ते म्हणाले.
चार महिन्यांत सात-बारा कोरा
भाजपने महाराष्ट्राला फसवले आहे. शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही. ती कधी मिळणार याची माहिती नाही. आमचं सरकार आलं तर चार महिन्यांत शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करु. शब्द पाळला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. साले म्हणणाऱ्यांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असा टोलाही त्यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना लगावला. या सरकारच्या कार्यकाळात सामान्य माणसांचे उत्पन्न कमी झाले. मात्र अदानी, अंबानीसारख्या उद्योगपतींचे उत्पन्न दुपटीने वाढले, असेही अजित पवार म्हणाले.
परभणी जिल्ह्यातील पाथरीमध्ये राष्ट्रवादीच्या “शिवस्वराज्य’ यात्रेत अजित पवार बोलत होते. तसेच राष्ट्रवादीच्या प्रत्येक सभेत यापुढे पक्षाच्या झेंड्यासह भगवा झेंडा फडकणार आहे. या भगव्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या सभांमध्ये आता पक्षाचा आणि भगवा झेंडा असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज कुणाजी जहागिरी नाही. शिवाजी महाराज कुणाच्या मालकीचे नाहीत, महाराज सगळ्यांचे आहेत. त्यानुसार परभणीत शिवस्वराज्य यात्रेदरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भगवे झेंडे लावण्यात आले होते.