नवी दिल्ली : भारत-चीन लडाखच्या सीमेवरील तणाव शांत होण्याचे नाव घेत नसून मुजोर चीनकडून कुरापती सुरूच असल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. अनेकवेळा केलेल्या चर्चा आणि कराराचं चीनकडून वारंवार उल्लंघन करण्यात येत आहे. गलवान खोऱ्यानंतर पैंगोग त्सो झील येथे 29 ऑगस्टला रात्री उशिरा भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य आमने-सामने आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
चिनी सैनिकांचा 29-30 ऑगस्टच्या रात्री पेंगाँग भागात केलेला घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी जशास तसे उत्तर देत हाणून पाडला आहे. अशातच सीमेवरील चीनच्या दादागीरीला हँडल करण्यासाठी आता देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हे देखील ऍक्टिव्ह झाले आहेत.
डोवाल यांनी आज केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत भारत-चीन सीमेवरील स्थितीचा आढावा घेतला. प्राप्त माहितीनुसार, या बैठकीस सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गुप्तचर संस्थांचे प्रमुखही उपस्थित होते. चीन आगामी काळात काय-काय करू शकतो यावर चर्चा झाल्याचे समजते.
यापूर्वीही, लडाखमधील तणाव कमी करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. यासंदर्भात त्यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी फोनवर संवाद साधला होता. यानंतर दोन्ही बाजूंचे सैनिक मागे घेण्यासही सुरुवात झाल्याचे वृत्त होते.
नेमकं काय झालं?
मिळालेल्या माहितीनुसार पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) तयार केलेल्या सहमतीच्या शर्तींचे उल्लंघन करत पूर्व लडाखच्या भागामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने पांगोंग आणि पांगोंग लेक क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या चीन सैन्याचा डाव उधळून लावला