सातारा (प्रतिनिधी) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. या अर्थसंकल्पात सातारा सैनिक स्कूलसाठी तीनशे कोटी रुपये, पाटण येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटन स्थळांसाठी भरीव तरतूद केल्याची घोषणा त्यांनी केली. सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाहीदेखील अजितदादांनी दिली.
राज्याच्या अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्यातील चार प्रमुख कामांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. सातारकरांचे स्वप्न असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महाबळेश्वर व पाचगणी या शहरांचा पर्यटन विकास आराखडा, सातारा सैनिक स्कूलसाठी घसघशीत निधी आणि पाटण तालुक्यात पोलीस प्रशिक्षण केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे.
राज्यातील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारने सातारा जिल्ह्यातील शाश्वत विकासावर भर दिला असून, त्यासाठी भरघोस निधीला मंजुरी दिली आहे. राज्य सरकारने गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यासाठी काही ना काही निधी दिला आहे. आता अर्थसंकल्पातही मोठा निधी दिल्याने अनेक विकासकामांची पूर्तता होणार आहे.
जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम गेल्या दहा वर्षांपासून अडले होते. कृष्णा खोरे विकास महामंडळाची जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे वर्ग झाल्यानंतर हे काम कधी सुरू होणार, याची सातारकरांना उत्सुकता आहे. शासनाने या महाविद्यालयासाठी निधीची वारंवार घोषणा केली होती. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही त्यासाठी पाठपुरावा केल्याने अर्थसंकल्पात महाविद्यालयासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या महाविद्यालयामुळे गोरगरीब लोकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटेल आणि जिल्हा शासकीय रुग्णालयावर येणार ताणदेखील कमी होईल.
महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटनस्थळांचा विकास आराखडा शासनाने तयार केला असून अर्थसंकल्पामध्ये शंभर कोटी रुपयांची आर्थिक तरतूद देखील केलेली आहे. साताऱ्यातील प्रसिद्ध व सर्वात जुन्या सैनिकी शाळेसाठीही भरीव निधी देण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात होती. या शाळेतील अंतर्गत कामांसाठी तब्बल तीनशे कोटी रुपये देण्याची घोषणा अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली आहे. हा निधी दरवर्षी 100 कोटी रुपयांप्रमाणे दिला जाणार आहे.
पाटण तालुक्यात पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू होण्यासाठी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पाठपुरावा केला होता. या प्रशिक्षण केंद्राला हिरवा कंदील दाखवत अजित पवार यांनी निधीची तरतूदसुद्धा केली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांची चाळण झाली आहे. अर्थसंकल्पात राज्यातील ग्रामीण रस्त्यांसाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यातील किती निधी सातारा जिल्ह्याला मिळणार, हे लवकरच स्पष्ट होईल.