मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे.त्यानिमित्त शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून रोखठोक मधून आपली भूमिका मंडळी आहे. यावेळी त्यांनी राज्यातील सत्तानाट्यामध्ये अजित पवार यांनी भाजपासोबत जाऊन राजभवनावर शपथविधीचा कार्यक्रम उरकला होता. ही घटना का घडली होती याबाबत खासदार संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे.
२२ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या नेहरु सेंटरमधील त्या बैठकीतील चर्चेनंतर अजित पवार यांनी तडकाफडकी निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण राऊत यांनी सामनातील रोखठोक या आपल्या सदरातून दिलं आहे.
दरम्यान, यानंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी यावरून निशाणा साधला आहे. “अजित दादा पवार आता बोला, इतके दिवस जे काही लोकांना वाटतं होत की तुम्ही धुतल्या तांदळासारखे आहात, पण ते तुम्ही नाही हे संजय राऊत यांनीच उघड केलं,” असं निलेश राणे म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर निशाणा साधला.
दरम्यान, रोखठोक सदरात राउत म्हणाले, “नेहरु सेंटरमध्ये २२ नोव्हेंबर रोजी सत्तेसाठीच्या वाटाघाटी सुरु असताना मल्लिकार्जुन खर्गे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली होती. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी खर्गे ठाम होते. यावरुन खर्गे आणि शरद पवार यांच्या शाब्दिक चकमक झाली. पवार त्यावेळी खूपच संतापले होते, त्यामुळे ते बैठकीतून उठले आणि निघून जाऊ लागले. याच बैठकीत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील हे शरद पवार यांनी सुचवले होते. पण खर्गे आणि पवार यांच्या चकमकीने बैठकीचा नूर पालटला होता. यावेळी अजित पवार बराच वेळ खाली मान घालून मोबाईलवर चॅटिंग करत होते. त्यानंतर त्यांचा फोन स्वीच ऑफ झाला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचे थेट राजभवनावर शपथविधी सोहळ्यातच दर्शन झाले.” असे राऊत म्हणाले.