नवी दिल्ली – भारतीय संघाच्या निवड समिती सदस्य पदासाठी माजी क्रिकेटपटू अजित आगरकर, राजेश शर्मा, मणिंदर सिंग आणि एस. एस. दास यांनी अर्ज केले ओहत. निवड समितीमध्ये सध्याच्या घडीला तीन पदे रिक्त आहेत. या तीन जागांसाठी चार अर्ज आल्याने निवडणूकीत रंगत आली आहे. या चार नावांपैकी मराठमोळा अजित आगरकार याचे नाव आघाडीवर आहे.
या निवड समितीमध्ये सुनील जोशी आणि हरविंदर सिंग हे दोन माजी क्रिकेटपटू आहे. या समितीचे अध्यक्षपद सुनील जोशी यांच्याकडे आहे. पण निवड समितीमध्ये अजून तीन सदस्यांची पदे रिक्त आहेत. यासाठी बीसीसाआयने अर्ज मागवले आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख होती.
त्यानुसार आगरकर, मणिंदर आणि दास यांनी अर्ज केले आहेत. त्याचबरोबर भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन शर्माही या शर्यतीमध्ये आहेत. यामुळे आता आगामी निवड समितीमध्ये नेमकी कोणची वर्णी लागते याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे. बीसीसीआयने अधिकृतपणे विभागीय व्यवस्थेपासून मुक्तता मिळविली असली तरी एकाच विभागातील दोन जणांना निवड समितीत ठेवण्याची शक्यता फारच कमी आहे.
दरम्यान, आगरकर आणि मणिंदर यांनी गेल्यावेळीही निवड समितीमधील पदासाठी अर्ज केला होता. त्यावेळी या दोघांचा विचार करण्यात आला नव्हता. पण या दोघांनी यावर्षी पुन्हा एकदा अर्ज केला आहे.