सातारा – मराठा साम्राज्याची चौथी आणि अखेरची राजधानी राहिलेला सातारा येथील अजिंक्यतारा किल्ला अद्यापही शिवसृष्टीच्या प्रतीक्षेत आहे. सांस्कृतिक संचलनालयाचे दुर्लक्ष आणि वित्त विभागाची आकसलेली तिजोरी यामुळे माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचा प्रस्ताव अनुदानाच्या रांगेतच आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य लाभलेला हा किल्ला पुरातत्त्व विभागाच्या दृष्टीने तितकासा महत्त्वाचा नसावा. त्यामुळेच तो आजपर्यंत असंरक्षित राहिला. मात्र, पर्यटन वाढवण्यासाठी साताऱ्यात हालचाली सुरू झाल्या. माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अजिंक्यतारा किल्ल्याची पाहणी करून शिवसृष्टी निर्मितीसाठी अनुदानाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजप प्रवेशापूर्वीच सादर केला होता. मात्र, पश्चिम महाराष्ट्राच्या अनुदान वाटपात तीस टक्क्यांची कपात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पश्चिम महाराष्ट्रातील महापूर व विदर्भाचा दुष्काळ यामुळे राज्य शासनाचे नियोजन कोलमडण्याचे सांगण्यात येत आहे. गड-किल्ल्यांवरून राज्यभरात उठलेलं वादळ खाली बसलं असलं तरी मराठा साम्राज्याची चौथी राजधानी अजूनही दुर्लक्षित आहे.
खासगी विकासकाच्या नरड्यात किल्ला घालण्याऐवजी शासनाने खास बाब म्हणून स्वनिधीतून किल्ल्याची दुरुस्ती, सुधारणा व सुविधांचा विकास करावा, अशी शाहूनगरवासीयांची अपेक्षा आहे. राज्यातील 25 गड-किल्ले पर्यटन विकासासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा वादग्रस्त निर्णय राज्य सरकारच्या अंगलट आला. प्रसारमाध्यमांमधून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर राज्य सरकारने वर्ग दोनचेच किल्ले भाडेतत्त्वावर दिले जातील, असे स्पष्टीकरण दिले आहे. वर्ग 1 मधील म्हणजे राज्य किंवा केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाने संरक्षित केलेल्या किल्ल्यांचा विकास शासन स्वतंत्रपणे करते. रायगडाप्रमाणे या वर्गवारीतील किल्ल्यांचे ऐतिहासिक वारसा म्हणून जतन केले जाते. राज्यातील उर्वरित 300 किल्ले हे असंरक्षित म्हणजे वर्ग 2 मधील आहेत. त्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण पर्यटन विभागाच्या सचिव विनिता सिंघल यांनी दिले होते.
अजिंक्यताऱ्याचे इतिहासात अनेक कारणांनी महत्त्व आहे. पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी, बजाजी निंबाळकर हे याच किल्ल्यावर कैदेत होते. आजारपणात छत्रपती शिवाजी महाराजांचे सुमारे दोन महिने वास्तव्य या किल्ल्यावर होते. शिवाजी महाराजांच्या पश्चात मुघल सम्राट औरंगजेब हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी आपल्या दोन मुलांसह किल्ल्याला वेढा टाकून बसला होता. चार महिन्यांपेक्षा अधिक काळ त्याला अजिंक्यताऱ्यावरील मूठभर मावळ्यांनी साताऱ्यात रोखले होते. रायगड मोगलांच्या ताब्यात गेल्यानंतर जिंजी आणि त्यानंतर अजिंक्यतारा किल्ला हा मराठा साम्राज्याची राजधानी राहिला. छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराजांचे राज्यारोहण याच किल्ल्यावर झाले होते. राजमाता येसूबाई, महाराणी ताराबाई, छत्रपती शाहू महाराजांचे वास्तव्य याच किल्ल्यावरील वाड्यात राहिले. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीनेही हा किल्ला महत्त्वपूर्ण आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या, हिंदवी साम्राज्याच्या, मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित असलेल्या किल्ल्यांना नखही लावू देणार नाही,’ अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा इरादा स्पष्ट केला आहे. पुरातत्त्व विभागाने अजिंक्यतारा किल्ल्याला “संरक्षित स्मारक’ म्हणून अद्याप सुरक्षाकवच दिलेले नाही. त्यामुळे हा किल्ला वर्ग 2 मध्येच राहिला आहे. परिणामी अजिंक्यतारा किल्ला विकसापासून दूर आहे. शिवसृष्टीचा आराखडा किल्ल्यावर गांभीर्याने राबवला जावा ही अपेक्षा आहे. शाहूनगरवासीय याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात, हे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे.