मुंबई – सरस कामगिरी करण्यात गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने अपयशी ठरत असलेला अजिंक्य रहाणे याला लवकरच सुर गवसेल, असा विश्वास भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर ही पहिलीच कसोटी मालिका आहे. पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला असला व न्यूझीलंडच्या अखेरच्या जोडीने भारतीय संघाला त्रस्त केले. मात्र, त्यापूर्वी भारतीय संघाच्या फलंदाजांनी नेमाने खेळ केला. सध्या चेतेश्वर पुजारा व रहाणे यांनी फारशी सरस कामगिरी केली नसल्याने त्यांच्यावर सध्या टीका होत आहे. मात्र, अपयशाचा टप्पा प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात येतो. रहाणे याच टप्प्यातून जात आहे.
त्याला भरात येण्यासाठी एका चांगल्या खेळीची गरज आहे, असे मत द्रविडने व्यक्त केले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करत असलेल्या अजिंक्य रहाणेला पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयश आले. मात्र, प्रशिक्षक राहुल द्रविडने रहाणेची पाठराखण करताना तो लवकरच भरात येइल, असे सांगितले.
कोहलीसाठी कोणाला वगळणार
कोहली दुसऱ्या कसोटीसाठी संघात आल्यानंतर रहाणेला मुंबई कसोटीत स्थान मिळेल का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. यावर द्रविडने आपले मत व्यक्त करताना एका गुणवान खेळाडूवर सातत्याने अशी टीका करणे योग्य नसल्याचे सांगितले आहे. कोहलीसाठी एखा खेळाडूला संघातील स्थान गमवावे लागेल मात्र, त्याबाबतचा निर्णय वानऱेडे स्टेडियमची खेळपट्टी पाहिलायावर घेण्यात येइल, असे मतही द्रविडने व्यक्त केला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी कसोटी 3 डिसेंबरपासून मुंबईत खेळवली जाणार आहे. या सामन्यात कर्णधार कोहली संघात पुनरागमन करेल.