मेलबर्न – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा घेतलेल्या कर्णधार अजिंक्य रहाणे याचे भारतासह जगभरातील अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी कौतुक केले आहे.
विराट कोहली, रोहित शर्मा, महंमद शमी व शिखर धवन यांच्यासारखे अव्वल खेळाडू संघात नसतानाही नव्या व जुन्या खेळाडूंची यशस्वीपणे मोट बांधून संघाला विजयाच्या मार्गावर आणणारा कर्णधार, अशा शब्दांत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याचे कौतुक केले आहे.
दुसरा सामना सुरु झाल्यावर रहाणेने केलेले गोलंदाजीतील बदल, प्रत्येक गोलंदाजाच्या मागणीनुसार लावलेले क्षेत्ररक्षण आणि स्वतःच्या कामगिरीने संघात चेतना निर्माण करणे यात रहाणेने अत्यंत चलाक नेतृत्व सिद्ध केले. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा अभ्यास करून त्यानुसार गोलंदाजांना सूचना देणे तसेच गोलंदाजीत अत्यंत हुशारीने बदल करणे या सर्व गोष्टीत रहाणेने अत्यंत हुशारी दाखवली, असेही ते म्हणाले.
रहाणेचे शतक निर्णायक ठरले
अजिंक्य रहाणेने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात फटकावलेले शतकच या सामन्याला कलाटणी देणारे ठरले. रहाणे व रवींद्र जडेजा यांची खेळीच या सामन्यात ऑस्ट्रेलियाला भोवली. रहाणे व जडेजा यांनी केलेली भागीदारी हाच फरक दोन्ही संघात होता. उत्तम नेतृत्व व आपल्या निर्णयाची आणि व्यूहरचनेची अंमलबजावणी यांमुळेच भारताने हा सामना जिंकला, अशा शब्दांत विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी रहाणेच्या कामगिरीचा गौरव केला.
उमेश यादवला दुखापत झाल्यानंतरही त्याने हातात असलेल्या गोलंदाजांकडून सरस कामगिरी करून घेतली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक फलंदाजाचा अभ्यास केल्याचे त्याच्या देहबोलीतून जाणवत होते. खास करून स्टिव्ह स्मिथसाठी त्याने लावलेले क्षेत्ररक्षण त्याच्या नेतृत्वाला सिद्ध करणारे होते, अशा शब्दांत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कौतुक केले आहे.
रहाणेने सामन्यातील उत्कंठा वाढवणारी स्थिती अत्यंत व्यवस्थित हाताळली. संघातील खेळाडूंचा अनुभव व क्षमता लक्षात घेत त्याने डावपेच आखले. महंमद सिराज व रवीचंद्रन अश्विन यांना त्याने छोटे स्पेल देत खूप थकणार नाहीत याची काळजी घेतली. त्यानेही शांत डोक्याने अनेक आश्चर्यकारक निर्णय घेतले व ते यशस्वीही करून दाखवले, असे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे. भारतीय क्रिकेटपटूच नव्हे तर इंग्लंडचा मायकेल वॉन, ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी रहाणेच्या नेतृत्वाला सलाम केला आहे.
रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने मेलबर्न कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून मात केली. विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या कसोटीत झालेला दारुण पराभव विसरत ऑस्ट्रेलियावर मात करत चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 बरोबरी करून दिली. त्याने कर्णधाराला साजेशी खेळी करताना पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात नाबाद 27 धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.