आसाममधील एआययूडीएफ पक्षाचे नेते बद्रुद्दीन अजमल हे वादग्रस्त विधाने करण्याबद्दल प्रसिद्ध असून, सध्याच्या त्यांच्या एका वक्तव्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.
“ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटचे (एआययूडीएफ) भाजपबरोबर संगनमत असून, त्यांच्याबरोबर युती करण्याचा आमचा बिलकुल विचार नाही’, असा खुलासा आसाम प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष झाकिर हुसैन सिकदर यांनी केला आहे. वास्तविक गेल्या वर्षी आसाम विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा कॉंग्रेसने एआययूडीएफशी आघाडी केली होती. परंतु त्यामधून कॉंग्रेसला कोणताही फायदा झाला नाही. उलट कॉंग्रेसचा पराभव होऊन तेथे भाजपची सत्ता आली आणि मुख्यमंत्रिपदी हेमंत बिस्व सरमा हे विराजमान झाले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत वा विधानसभा-लोकसभा निवडणुका असोत त्यात एआययूडीएफशी समझोता करण्याचा कॉंग्रेसचा विचार नाही. आसाममधील ही एक महत्त्वाची घडामोड मानली पाहिजे.
एकेकाळी आसामात कॉंग्रेसची दीर्घकाळ सत्ता होती. परंतु देशभर सर्वत्र कॉंग्रेसची धूळदाण उडत गेली आणि आसाममध्येही तेच घडले. एआययूडीएफलाही आपल्या अस्तित्वासाठी कॉंग्रेसची गरज वाटत आहे. परतुं आपला हा मित्रच आपल्याशी गद्दारी करत असल्याची कॉंग्रेसची भावना आहे. एआययूडीएफशी कॉंग्रेसने यापूर्वी अनेकदा आघाडी केली आहे आणि नंतर काडीमोडही घेतला आहे. एआययूडीएफचे अध्यक्ष बद्रुद्दीन अजमल यांनी गेल्याच महिन्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपविरोधी मोर्चेबांधणीसाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले होते. अशीच आघाडी आसाममध्येही व्हावी आणि नितीशकुमार यांच्या या आघाडीत कॉंग्रेस तसेच तृणमूल कॉंग्रेसने सामील व्हावे, अशी इच्छा अजमल यांनी व्यक्त केली होती.
अजमल हे वादग्रस्त विधाने करण्याबद्दल प्रसिद्ध असून, सध्याच्या त्यांच्या एका वक्तव्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. हिंदूंनीदेखील मुस्लिमांप्रमाणे लवकर लग्ने करावीत, असे आवाहन त्यांनी केले होते. मुस्लीम पुरुष वीस-बाविसाव्या वर्षी आणि स्त्रिया अठराव्या वर्षी निकाह लावतात. उलट हिंदू हे विवाहापूर्वी बेकायदेशीरपणे दोन किंवा तीन बायकांशी संबंध ठेवतात. या संबंधांतून मजा लुटतात आणि मुले होऊ न देण्याची खबरदारीही घेतात व पैसे वाचवतात. चाळिसाव्या वर्षांनंतर पालकांच्या दडपणापोटी ते लग्न करतात. वयाच्या चाळिशीनंतर त्यांना मुले होतील, अशी अपेक्षा कशी काय करता येईल? म्हणूनच त्यांनी मुस्लिमांप्रमाणे लवकर लग्न करून मुले जन्माला घालावीत, असे धक्कादायक उद्गार अजमल यांनी काढले होते. मुळात हिंदू हे चाळिशीनंतर लग्न करतात, हा अजमल यांनी लावलेला शोध बोगस आहे. त्यासाठी त्यांनी कुठलाही पुरावा किंवा कोणतीही आकडेवारी सादर केलेली नाही. अशा प्रकारे निराधार वक्तव्य करून हिंदू समाजाला बदनाम करण्याचा अजमल यांना कोणताही अधिकार नाही. शिवाय मुस्लीम समाजात जर कमी वयात लग्ने होत असतील, तर ती स्वागतार्ह गोष्ट आहे, असे म्हणता येणार नाही. उलट मुस्लीम तरुण-तरुणींनी आधी चांगले शिकावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि मगच वैवाहिक जीवनाची जबाबदारी उचलावी, असा उपदेश नेत्यांनी करणे आवश्यक आहे. त्याउलट चुकीच्या गोष्टींचे समर्थन करून, अजमल हे भलताच उपदेश करत आहेत. भडकावू विधाने करण्याबद्दल एकाच समाजाला दोष देऊन चालणार नाही.
अजमल यांच्यासारख्या भंपक नेत्यांचीही कानउघाडणी करणे आवश्यक आहे. अजमल यांनी हे उद्गार काढल्याबरोबर, “तुम्ही बांगलादेशात चालते व्हा’, असे भाजपचे आमदार दिगंत कालिता यांनी त्यांना फर्मावले. तुमच्यासारख्या मुस्लिमांकडून आम्हाला काहीही शिकण्यासारखे नाही, बांगलादेशीयांना भारतात कसलेही स्थान नाही, असे प्रत्युत्तर देऊन, कालिता यांनी वातावरण आणखीच बिघडवले आहे. या प्रकारे अनेकांनी वाजवल्यानंतर, अजमल यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र अजमल यांचा जन्म बांगलादेशात झालेला नसून, आसाममधील होजाई येथे झाला आहे. परंतु त्यांचे घराणे मूलतः पूर्व बंगालच्या सिल्हेट जिल्ह्यातील आहे. त्यांचे वडील हाजी अजमल अली हे भात शेतकरी होते. मुंबईत जाऊन त्यांनी अत्तराच्या उद्योगात प्रवेश केला. 1960च्या दशकात त्यांनी अत्तराचे पहिले दुकान उघडले आणि नंतर मध्यपूर्वेत आपल्या अत्तराच्या ब्रॅंडचे नाव केले. अजमल परफ्युम्सच्या मालकाचे चिरंजीव अजमल यांनी 2005 साली एआययूडीएफची स्थापना केली.
आसाममधील “जमैयत उलेमा ई हिंद’चे बद्रुद्दीन अजमल हे अध्यक्ष आहेत. धुबरी मतदारसंघातून ते तीनदा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. जगातील पाचशे सर्वाधिक प्रभावशाली मुस्लिमांमध्ये अजमल यांचा समावेश होतो. हाजी अब्दुल माजिद मेमोरियल पब्लिक ट्रस्टमार्फत ते इस्पितळेही चालवतात. अजमल फाउंडेशन या बिगरसरकारी संस्थेमार्फत आसामात पंचवीसेक शिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. 2006 साली एआययूडीएफने प्रथमच निवडणुका लढवल्या आणि कॉंग्रेसच्या विरोधात दहा विधानसभा मतदारसंघांत विजय मिळवला. 2011 साली एआययूडीएफला 18 जागा मिळून, प्रमुख विरोधी पक्ष म्हणून त्यांनी स्थान संपादन केले. 2014च्या लोकसभा निवडणुकांत नरेंद्र मोदींची लाट असूनही, अजमल यांनी धुबरीमधून लोकसभेवर विजय मिळवला. त्यांच्या पक्षास तीन ठिकाणी लोकसभेत यश मिळाले. परंतु 2016च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आसामात सत्ता मिळवली, तेव्हा एआययूडीएफच्या जागा कमी होऊन तेरावर आल्या. 2019च्या लोकसभा निवडणुकीत एआययूडीएफचा एकाच ठिकाणी, म्हणजे अजमल यांच्या जागेवर विजय झाला. 2021 मध्येही एआययूडीएफ व कॉंग्रेस यांच्या आघाडीचा धुव्वा उडाला. लोकसभेत सात मुले असलेले अजमल हे एकमेव खासदार आहेत. पक्षाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी ते पुन्हा एकदा धर्माचा आधार घेत असून, हे दुर्दैवी आहे.