मुंबई – एकीकडे ओमायक्रॉनमुळे विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाली असतांनाच तेल कंपन्यांनी विमानाच्या इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. त्यामुळे या वर्षी देशातील नागरी विमान वाहतूक कंपन्यांना 20 हजार कोटी रुपयांचा तोटा होणार आहे.
क्रिसील या संस्थेने या संदर्भात तयार केलेल्या अभ्यास अहवालात म्हटले आहे की, गेल्या वर्षी विमान कंपन्यांना 13,853 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. त्यामध्ये आता आणखी 44 टक्क्यांची वाढ होणार आहे. त्यामुळे या तोट्यातून बाहेर पडण्यासाठी विमान कंपन्यांना 2024 वर्ष उजाडण्याची शक्यता आहे.
भारतामध्ये इंडिगो, स्पाइस जेट, एअर इंडिया या प्रमुख नागरी विमान वाहतूक कंपन्या आहेत. गेल्या वर्षी विमान प्रवाशांची संख्या वाढत होती. त्यामुळे विमान कंपन्यांनी आपली उड्डाणे वाढविण्यास सुरुवात केली होती. डिसेंबर 2021 मध्ये उड्डाणाची संख्या नियमित उड्डाणाच्या 86 टक्के इतकी होती. मात्र त्यानंतर परिस्थिती बिघडत गेली.
आता विमान प्रवाशांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे उड्डानावर परिणाम होत आहे. ओमायक्रॉनच्या काळात जागतिक बाजारात इंधनाचे दर वाढत असल्यामुळे तेल कंपन्यांनी विमानाच्या इंधनाचे दर वाढविण्यास सुरुवात केली आहे.
एकीकडे प्रवाशांची संख्या कमी असताना विमानाचे उड्डाण महागात पडत असल्यामुळे विमान कंपन्याच्या तोट्यात वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले. काही वर्षांपूर्वी विमानाच्या इंधनाची किंमत प्रति लिटरला 44 रुपये होती. ती आता 83 रुपयांवर गेली आहे. विमान इंधनाची दरवाढ टाळावी असे बहुतांश विमान कंपन्यांनी सरकारला सांगितले आहे. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे विमान कंपन्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.