नवी दिल्ली – केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने हवाई सुरक्षा शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही प्रमाणात हवाई प्रवास महागणार आहे.
मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हवाई सुरक्षा शुल्क 150 रुपयांवरून 160 रुपये केले जाणार आहे. तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांना हे शुल्क 4.85 डॉलरवरून 5.2 डॉलर करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 सप्टेंबरपासून होणार आहे. प्रवाशी तिकिटाचे बुकिंग करतात त्यावेळी प्रवाशांकडून ही रक्कम घेऊन नंतर ती सरकारकडे दिली जाते.
सरकार विमानतळावरील सुरक्षेसाठी होणाऱ्या खर्चासाठी या पैशाचा उपयोग करते. गेल्या वर्षीही या शुल्कात वाढ करण्यात आली होती. सध्या विमान प्रवाशांची संख्या बऱ्याच प्रमाणात कमी असल्यामुळे विमान कंपन्या अडचणीत आलेल्या आहेत. त्यांनी कर्मचाऱ्यांचे पगार कमी करणे सुरू केले आहे. त्याबरोबर खर्चात कपात केलेली आहे. असे असतानाच सरकारने या शुल्कात वाढ करून विमानसेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या अडचणीत वाढ केली आहे.
दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर विमान कंपन्यांनी 25 मे पासून देशांतर्गत सेवा सुरू केली असली तरी प्रवाशांची संख्या एकूण क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे तर आंतरराष्ट्रीय प्रवास अद्याप सुरू झालेला नाही.