पुणे – राज्य शासनाने गोवा, गुजरात, दिल्ली आणि राजस्थानातून येणाऱ्या विमान आणि रेल्वे प्रवाशांना करोना चाचणी बंधनकारक केली आहे. मात्र, ही चाचणी टाळण्यासाठी या राज्यांतून येणारे प्रवासी “कनेक्टिंग फ्लाइट’चा पर्याय निवडत आहेत. त्यामुहे बंदी नसलेल्या राज्यातून हे प्रवासी विमानाद्वारे पुण्यात येत आहेत. या प्रवाशांची चाचणी केली जात नसल्याचे समोर आले आहे.
या चार राज्यांमध्ये करोनाचे नवे बाधित मोठ्या संख्यने आढळत आहेत. त्यामुळे या राज्यांतून आलेने नागरिक महाराष्ट्रात करोनाचा प्रसार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे विमान तसेच रेल्वे प्रवाशांना करोना चाचणी अहवाल असल्याशिवाय विमानतळावरून राज्यात येता येणार नसल्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
ज्या प्रवाशांनी विमान तिकिटे बुक केली आहेत, त्यांनी प्रवासाआधी चाचणी केल्यास आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास प्रवास करता येणार नाही. तसेच तिकिटाचे पैसेही बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रवाशांनी पुण्यात येण्यासाठी हैद्राबाद, कोलकाता, कोची, बंगळुरू आदी विमानतळांवरून पुण्यात येण्यासाठी असलेल्या “कनेक्टिंग फ्लाइट’चा वापर केला जात आहे.
महापालिकेच्या तपासणीत समोर आली बाब
लोहगाव विमानतळावर प्रवासी आल्यानंतर महापालिका यंत्रणा त्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करते. त्यात ताप, सर्दी, खोकला तसेच करोनाची इतर लक्षणे असलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्या करोना चाचण्या करून त्यांना घरी सोडण्यात येते. अशा प्रवाशांच्या माहितीतून ते बंदी असलेल्या राज्यातून “कनेक्टिंग फ्लाइट’ घेऊन पुण्यात आल्याचे समोर आले आहे.