पुणे –राज्यात आलेल्या धुळीच्या वादळाचा प्रभाव सोमवारी (दि.24) ओसरला असला, तरी यामुळे पुणे आणि मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता दिल्लीपेक्षाही अधिक ढासळली असल्याची नोंद घेण्यात आली आहे.
सौदी अरब येथे निर्माण झालेले धुळीचे वादळ अरबी समुद्रामार्गे रविवारी (दि.24) राज्यात पोचले. या वादळाद्वारे मोठ्या प्रमाणात धुळ वाहून आणली गेल्याने गेली 24 तास पुणे, मुंबईसह उत्तर कोकणात ढगाळ वातावरणासह धुळीचे सावट होते. त्यामुळे दृष्यमानता कमी झाली होती. वातावरणात पसरलेल्या धुळीमुळे पुण्यासह मुंबई येथे धुलीकणांचे प्रमाण वाढल्याची नोंद आयआयटीएम-सफर या संकेतस्थळावर घेण्यात आली. दरम्यान, धुळीच्या वादळामुळे शहरातील हवेची गुणवत्ता वेगाने ढासळली. शहरात 72 तासांपूर्वी चांगली असलेली हवेची गुणवत्ता आता “अत्यंत वाईट’ असल्याचे दिसते. त्यामुळे मास्कचा वापर करोना बरोबरच आता धुळीपासून संरक्षणासाठी होत आहे.
…प्रदूषकाचे प्रमाण 357 प्रतिघनमीटर
आयआयटीएम-सफर संस्थेने घेतलेल्या नोंदीनुसार, पुण्यातील हवेतील पीएम 10 या प्रदूषकाचे प्रमाण 357 प्रतिघनमीटर इतके होते, तर पीएम2.5 या प्रदूषकाचे प्रमाण 216 प्रतिघनमीटर इतके नोंदविण्यात आले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मानकानुसार हे प्रमाण अनुक्रमे 100 आणि 80 प्रतिघनमीटर असणे अपेक्षित आहे. त्याउलट सर्वाधिक प्रदूषित शहर मानल्या जाणाऱ्या दिल्ली येथे पीएम 10 या प्रदूषकाचे प्रमाण 156 प्रतिघनमीटर तर तर पीएम2.5 या प्रदूषकाचे प्रमाण 95 प्रतिघनमीटर इतके नोंदविण्यात आले. त्यामुळे सोमवारी शहरातील हवेच्या प्रदूषणात लक्षणीय वाढ होऊन, गुणवत्ता “अत्यंत वाईट’ स्तरावर पोहचली होती.