वॉशिंग्टन – भारत सरकार सरकारी कंपन्यांची निर्गुंतवणूक करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करीत होते. मात्र त्याला फारसे यश मिळत नव्हते. आता एअर इंडियाची विक्री टाटा समूहाला करण्यात आली आहे. यामुळे भारतातील खासगीकरणाच्या मोहिमेला चालना मिळेल असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे.
सरकारी कंपन्यांचे खासगीकरण गुंतागुंतीचे असते. सरकारी कंपन्यातील कर्मचाऱ्यांना रोजगाराची हमी देणे गरजेचे असते. यातून मार्ग काढण्यात केंद्र सरकार यशस्वी झाले आहे. त्यामुळे आगामी काळात सरकारी कंपन्यांचे खासगीकरण वेगात होईल अशी आशा नाणेनिधीने व्यक्त केली आहे.
केंद्र सरकारने गरिबांची काळजी घेत आर्थिक सुधारणा जारी ठेवल्या आहेत. करोनाच्या काळात भारतात गरीकंना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यता आला. त्याचबरोबर समांतररित्या सरकारी बॅंकांची परिस्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे आगामी काळामध्ये अर्थव्यवस्था अधिक वेगाने वाढण्यास मदत होणार असल्याचे मत नाणेनिधीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
सरकारकडे मिश्र अर्थव्यवस्थेच्या काळामध्ये बऱ्याच मालमत्ता विकसित करण्यात आल्या. मात्र त्यांचा आता फारसा उपयोग होत नाही. त्या मालमत्ता लीजवर देण्याचे धोरण केंद्र सरकारने सुरू केले आहे. त्यामुळे त्या मालमत्ताचा उपयोग होईल.
बॅंकिंग आणि कामगार क्षेत्रात योग्य त्या सुधारणा करण्यात आल्यामुळे आगामी काळामध्ये भारतामध्ये देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूक वाढत राहण्याची शक्यता नाणेनिधीने व्यक्त केली आहे. दरम्यानच्या काळात उद्योग सुलभ करणे सुलभ व्हावे याकरिता अनेक पातळ्यांवर उपाययोजना सुरू झाल्या आहेत. यामध्ये डिजीटल तंत्रज्ञानाचा उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे दीर्घ पल्ल्यात भारतातील उद्योग क्षेत्र कार्यक्षम होईल. त्याचबरोबर गुंतवणूक आकर्षित होईल.