नवी दिल्ली – दीड वर्षांपासून देशात कोरोना महामारी सुरू असून अद्याप दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढताना दिसतेय. अशातच हा संसर्ग रोखण्यासाठी देशातील विमान सेवा एका देशातून दूसऱ्या देशात सुरू ठेवण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र आता AirIndia ही विमानसेवा येत्या 11 ऑगस्टपासून त्यांची उड्डाणं सुरू करणार असल्याचे सांगितले जात आहे.
एअर इंडियाची प्रादेशिक उपकंपनी अलायन्स एअर 11 ऑगस्टपासून रांचीमार्गे कोलकाता-भुवनेश्वर उड्डाणे सुरू करणार आहे. अलायन्स एअरने दिलेल्या माहितीनुसार, ते 11 ऑगस्टपासून कोलकाता-रांची-भुवनेश्वर मार्गावर उड्डाणे सुरू करत आहेत. हे उड्डाण प्रत्येक सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारी सुरू राहणार आहे. ही विमान कंपनी या शहरांना जोडण्यासाठी 70 आसन क्षमता असणारं विमान सुरू करणार आहे.
कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, फ्लाइट 99L 720 सकाळी 8 वाजता कोलकाता येथून सुटणार असून सकाळी 9:40 वाजता रांचीला पोहोचेल आणि तेथून सकाळी 10.10 वाजता रवाना होऊन 11.15 वाजता भुवनेश्वरला पोहोचणार आहे. यासह 9L 719 हे फ्लाईट भुवनेश्वर येथून 12.45 वाजता सुटणार आहे तर 12.50 वाजता रांचीला पोहोचणार आहे. त्यानंतर तेथून दुपारी 1:15 ला सुटून ते 2.50 वाजता कोलकाता पोहोचणार आहे.
यापूर्वी, हवाई वाहतूक मंत्रालयाने असे सांगितले होते की, 20 ऑगस्टपासून दररोज गुजरातमधील भावनगर ते दिल्ली आणि मुंबईसाठी उड्डाणे प्रथमच सुरू होणार आहेत. तसेच नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मात्र कोणत्या विमानसेवा या मार्गावर उड्डाणे सुरू करतील हे मात्र अद्याप स्पष्ट केले नाही.
20 ऑगस्टपासून पहिल्यांदाच नवी दिल्ली आणि भावनगर दरम्यान दररोज उड्डाणे सुरू होतील. यासह, मुंबई-भावनगर दरम्यानची उड्डाणे देखील 20 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची माहिती नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विट करून दिली आहे.