मुंबई : लॉकडाऊनदरम्यान आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाने कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने काही कर्मचाऱ्यांना सहा महिने ते पाच वर्षांसाठी विनावेतन सुट्टीवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांचे कौशल्य, कामाची गुणवत्ता आणि आरोग्याचा विचार करुन कोणत्या कर्मचाऱ्याला किती दिवसांच्या सुट्टीवर पाठवावे, हा निर्णय घेतला जाणार आहे. या योजनेला ‘लीव विथाउट पे’ असंदेखील म्हणतात
एअर इंडियाच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या 102 व्या बैठकीत या योजनेला मंजूरी देण्यात आली. या योजनेसुसार कर्मचाऱ्यांची यादी मुख्यालयात पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनदरम्यान राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आले. त्यामुळे विमान कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
देशात 25 मे पासून देशांतर्गत उड्डाणांना परवानगी देण्यात आली. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवा 31 जुलै पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, केंद्र सरकारच्या ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत 6 मेपासून विदेशात अडकलेल्या भारतीयांना एअर इंडियाच्या विमानांनी भारतात परत आणले जात आहे. एअर इंडियाने कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. एअर इंडियाचे सर्व कार्यालये 20 जुलै पासून सुरु होणार आहेत. त्यामुळे जो कर्मचारी कार्यालयात हजर राहणार नाही, त्याची सुट्टी गृहित धरली जाईल. दरम्यान, कंटेन्मेंट झोन परिसरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे.