मुंबई : येत्या जून महिन्यापर्यंत जर एअर इंडिया विकत घेण्यासाठी ग्राहक मिळाले नाहीत तर जून पासून ही सेवा बंद करण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र खरेदीदार मिळाला नाही तर महाराजाचा हा पांढरा हत्ती पोसणे निव्वळ अशक्य असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
देशाची पहिली विमान वाहतूक कंपनी असणाऱ्या एअर इंडियाच्या भवितव्या विषयी सध्या अनिश्चिततेचे वातावरण आहे. सध्या ताफ्यातील लहान 12 विमाने सुरू करण्यासाठीही निधीची आवश्यकता आहे. या विमानसेवेवर आधीच कोट्यवधीचे देणे आहे. त्यातच सरकार या कंपनीच्या निर्गूंतवणूकीच्या प्रयत्नात आहे.
या बाबत धोक्याची सूचना देताना एक अधिकारी म्हणाला, जर पुढील जूनच्या आधी कोणी खरेदीदार भेटला नाही तर एअर इंडियाची वाटचालही जेट एअर वेजच्या दिशेने होणार आहे. सरकार खासगीकरणाच्या धोरणानुसार कोट्यवधीच्या देण्यात असलेल्या कंपनीत कोणतीही गुंतवणूक करण्यास तयार नाही. ही विमान सेवा सध्या कशी तरी आपल्या खर्चाची सोय करत आहे. मात्र हे फार काळ चालणार नाही.
युपीए सरकारच्या काळात या विमानसेवेच्या पनुरूज्जिवनाचे प्रयत्न झाले होते. त्यावेळी काही कोटी सरकारने गुंतवले होते. आताही या कंपनीला तेवढ्या हमी रकमेची सरकारने खात्री द्यावी अशी अपेक्षा आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
गेली 25 वर्ष सेवेत असणाऱ्या या विमान सेवेला 2018-19 पासून पैशाची चणचण भासू लागली. मात्र सरकारने कोणत्याही स्वरूपाची मदत केली नाही. याबाबात एअर इंडियाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला मात्र तो होऊ शकला नाही.