नवी दिल्ली – कोणत्याही संभाव्य धोक्यांचा सामना करण्यासाठी हवाई दल पूर्णपणे सज्ज असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व संबंधित भागांमध्ये सज्जता राखण्यात आली आहे, असे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर.के.एस. भदौरिया यांनी आज सांगितले. पूर्व लडाखच्या सीमेवर भारतीय लष्कर आणि चिनी सैन्यामध्ये निर्माण झालेल्या कोंडीच्या संदर्भात ते बोलत होते.
8 ऑक्टोबर हा हवाई दल दिन असतो. त्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. चीनची हवाई क्षमता भारताच्या क्षमतेपेक्षा अधिक असू शकत नाही. मात्र, त्याचवेळी प्रतिस्पर्ध्यांना आपण कमी लेखत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
भारतीय हवाई दल जर वेळ पडली तर एकाचवेळी उत्तर आणि पश्चिम अशा दोन आघाड्यांवर लढण्यासाठी तत्पर आहे. कोणत्याही आकस्मित परिस्थितीला तोंड देण्यासाठी हवाई दल पूर्णपणे सज्ज आहे. सर्व संबंधित ठिकाणांवर तैनात केली गेली आहे. लडाख तर खूपच छोटा भाग आहे. उत्तर सीमेवरील कोणत्याही कृतीसाठी हवाई दल खूप चांगल्याप्रकारे सज्ज आहे. हवाई दलामध्ये राफेल विमाने सहभागी झाल्यामुळे हवाई दल आता सक्रिय पातळीवर आहे, असे भदौरिया यांनी चीनच्या संभाव्य धोक्याबद्दल विचारले असता सांगितले.
वायुसेनेने आधीच लढाख पूर्व लडाखमधील सीमारेषेजवळच्या हवाई तळांवर जवळपास सर्व ठिकाणी आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ काही ठिकाणी सुखोई 30 एमकेआय, जग्वार आणि मिरज 2000 अशी जवळपास सर्व लढाऊ विमान तैनात केली आहेत.
पूर्व लडाखच्या सीमेवर भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये गेल्या पाच महिन्यांपासून कोंडी निर्माण झाली आहे. दोन्ही बाजूंमध्ये उच्चस्तरीय पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, त्यामध्ये अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. 12 ऑक्टोबरला दोन्ही देशांच्या लष्करी कमांडरमध्ये चर्चेची पुढची फेरी होणार आहे.