नवी दिल्ली – देशात करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. दररोज २ लाखांहून अधिक रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. अशातच करोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर देखील विषाणूची बाधा झाल्याची काही प्रकरणे समोर आल्याने चिंतेत भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर आज ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी लसीच्या परिणामकारकतेबाबत मोठं विधान केलं आहे.
“आपण प्रथम, कोणतीही लस १०० टक्के परिणामकारक नाही हे सत्य स्वीकारायला हवं. तुम्हाला लस घेतल्यानंतरही करोनाची बाधा होऊ शकते मात्र लसीकरणामुळे तुमच्या शरीरात निर्माण झालेल्या अँटीबॉडीज विषाणूला वाढण्यापासून रोखतात. परिणामी तुम्ही गंभीर आजारपणापासून वाचता.” असा दावा गुलेरिया यांनी केला आहे. एका नामांकित वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हे विधान केलंय.
दरम्यान, देशात करोनाची दुसरी लाट आलेली असताना देखील धार्मिक कार्यक्रमांसाठी, व राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचारसभांमध्ये होत असलेल्या गर्दीबाबतही त्यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले.
ते म्हणाले, “हा वर्षातील तो काळ आहे जेव्हा आपल्याकडे अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात. याखेरीज काही राज्यांमध्ये निवडणुका देखील आहेत. मात्र लोकांचे प्राण देखील महत्वाचे आहेत हे आपण समजून घ्यायला हवं. आपण धार्मिक कार्यक्रम प्रातिनिधिक स्वरूपात साजरे केल्यास धार्मिक भावनाही दुखावणार नाहीत व करोनासंबंधीच्या नियमांचे पालन ही होईल.”
We have to remember that no vaccine is 100% efficient. You may get the infection but the antibodies in our body will not allow the virus to multiply and you’ll not have the severe disease: AIIMS Director Dr Randeep Guleria
— ANI (@ANI) April 17, 2021