नवी दिल्ली – देशात करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळालं. नव्या बाधितांचा धडकी भरवणारा आकडा व त्यासोबतच मृतांच्या संख्येत झालेली वाढ यांमुळे अनेक राज्य सरकारांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. कडक निर्बंधांमुळे विषाणूची साखळी तोडण्यात मदत झाली असून गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्येचा आलेख हळूहळू ओसरताना दिसतोय.
असं असलं तरी विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. या लाटेचा सर्वाधिक धोका बालकांना असेल असे भाकीतही काहींकडून वर्तविण्यात आले होते. मात्र एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी तिसरी लाट बालकांसाठी घातक असेल हा दावा फेटाळून लावला आहे.
याबाबत बोलताना गुलेरिया यांनी, “तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका बालकांना असेल असं सांगण्यात येतंय. मात्र बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेने अशा प्रकारचे दावे हे तथ्यांवर आधारित नसल्याचं म्हंटल आहे. त्यामुळे करोनाची तिसरी लाट बालकांसाठी घातक ठरेल असं वाटत नाही. पालकांनी याबाबतची भीती बाळगू नये.” असा दावा केला.
दरम्यान, ‘करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर देशात विषाणू संसर्गाची तिसरी लाट येईल, तिची दाहकता कमी करायची असल्यास लसीकरण मोहिमेचा वेग वाढवा’ असा सल्ला तज्ज्ञमंडळींनी दिला आहे.
तर काहींनी तिसऱ्या लाटेचा धोका बालकांना अधिक असल्याचं म्हंटल होत. बालकांसाठी तिसरी लाट धोकादायक ठरेल की नाही याबाबत मतमतांतरे असली तरी विषाणू संसर्गाची तिसरी लाट येण्याबाबत मात्र तज्ज्ञांमध्ये एकमत असल्याचंच पाहायला मिळतंय. यामुळे पहिल्या लाटेनंतर करोनासंबंधित नियमांची झालेली पायमल्ली दुसऱ्या लाटेनंतर होऊ नये अशी अपेक्षा तज्ज्ञांकडून केली जातीये.
It has been said that children will be infected the most in the third wave but Pediatrics Association has said that this is not based on facts. It might not impact children so people should not fear: Dr Randeep Guleria, Director, AIIMS#COVID19 pic.twitter.com/hsU0Kqh5gj
— ANI (@ANI) May 24, 2021