मुंबई: देशभरात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. यामध्ये महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आज ‘माझे अंगण, माझे रणांगण’ आंदोलनाची हाक दिली आहे. भाजपच्या नेत्यांनी राज्यभरात आपआपल्या घराच्या अंगणात, कार्यालयाबाहेर काळ्या फिती बांधून, ठाकरे सरकारविरोधातील घोषणांचे फलक हातात घेऊन उभे राहिले आहेत.
दरम्यान, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. थोरात म्हणाले, चंद्रकांत दादांचे आंगण नेमके कोणते? देवेंद्र फडणवीस तरी आपल्या अंगणात नागपूरला गेले का? त्यांच्या अंगणात काँग्रेस कार्यकर्तेच मदतकार्य करत आहे. कायम राज्यपालांच्या आंगणात जाण्यापेक्षा भाजप नेत्यांनी स्वतःच्या अंगणात जाऊन जनतेला मदत करावी!
संकटात असणाऱ्या महाराष्ट्राला राजकीय रणांगण बनविणे हे कुठले शहाणपण? राजकारणासाठी आयुष्य पडलंय, आजची वेळ निर्धाराने आणि एकजुटीने लढण्याची आहे, इतिहास भाजपची ही काळी कृती कधीही विसरणार नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.