चेन्नई – भारतीय जनता पक्षाने तामिळनाडुत अद्रमुकशी युती करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. तथापि अशी युती झाली आणि ही युती सत्तेत आली तरी त्या सरकारमध्ये भाजपला स्थान नसेल, तामिळनाडु हा द्रविडी संस्कृतीचा मध्यवर्ती प्रांत असून या प्रांतात भाजपला आपली कोणतीही छाप पाडता येणार नाही असेही अद्रमुकने स्पष्ट केले आहे.
या पक्षाने भाजपला काही अटीही जाहीरपणे ऐकवल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की भाजपला जर आमच्याशी आघाडी करायची असेल तर त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी के पलानीस्वामी यांनाच पाठिंबा द्यावा लागेल. आणि भाजपला या आघाडी सरकारमध्ये सहभागी होता येणार नाही.
या अटी मान्य असतील तरच भाजपने आमच्याशी युती करावी अन्यथा त्यांनी त्याचा फेरविचार करावा असा जाहीर इशाराही अद्रमुक पक्षाच्यावतीने देण्यात आला आहे. अद्रमुकचे उप समन्वयक के. पी. मुनुस्वामी यांनी हा इशारा देताना म्हटले आहे की गेली 50 वर्ष तामिळनाडुतील जनतेने द्रविडी संस्कृतीच्या बाहेरील कोणत्याही राजकीय पक्षाला तामिळनाडुत स्थान दिलेले नाही.
जयललिता,करूणानिधी यांच्या सारख्या द्रविडी नेत्यांच्या निधनानंतर आता काही राजकीय पक्ष तामिळनाडुत आपले हातपाय पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत असा दावाही त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव न घेता केला.
आज मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांच्या उपस्थितीतच मुनुस्वामी यांनी ही वक्तव्ये केल्याने ती पक्षाची अधिकृतच भूमिका आहे असे मानले जाऊ लागले आहे. तामिळनाडुत एप्रिल किंवा मे महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत.