शेवगाव (प्रतिनिधी) – शेवगाव माळेगाव रस्त्याच्या ओढ्यावरील पुलावर बंधाऱ्याचे पाणी साचल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. या ओढ्यावरील बंधारा तुडूंब भरल्याने येथील पुल दिसेनासा झाला. तसेच येथे मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.
पुलाची उंची वाढवण्यात यावी व बंधाऱ्याचे दरवाजे उघडे करुन पुलावरील पाणी वाहते करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रताप फडके, शिवाजी नाईकवाडी, भास्कर शेलार, सुदाम गावडे, आयुब जहागीरदार, सुभाष दारकुंडे यांनी दिला आहे.
या रस्त्यालगत शहरातील गहिले वस्ती, ढाकणे वस्ती, जहागीरदार वस्ती, गावडे वस्तीचा भाग आहे. येथे शेतकऱ्यांचे वास्तव्य असल्याने शेतमाल, भाजीपाला, अत्यावश्यक वस्तुसाठी त्याना सतत शहरात यावे लागते. गेल्या अनेक वर्षापासुन या पुलाची उंची वाढविण्याची मागणी दुर्लक्षीत असल्याने आज त्यांना यातना सहन कराव्या लागत आहेत. मुळात हा रस्ता अरुंद असुन ओढयात जवळपास दहा फुट गाळ साचलेला आहे.
पुलावरील पाण्याने रस्ता दिसत नसल्याने ओढयाच्या पात्रात एखादे वाहन पडल्यास दुर्घटना होऊ शकते. करोना साथीने काही संशयीत रुग्णांना तपासणीची आवश्यकता भासल्यास किंवा कोणी आजारी पडल्यास शहरात येणे मुश्किल झाले आहे. माळेगावच्या नागरीकांना अत्यावश्यक वस्तुसाठी सध्या दहा पंधरा किलोमीटरचा वळसा घालून गेवराई रस्त्याने शहरात येणे भाग पडत आहे. ऐनवेळी काही संकट ओढावल्यास नागरिकांना शहरात येण्यासीठी पंधरा किलोमीटर वळसा घालावा लागेल.
धुवॉंधार पावसाने तालुक्याला झोडपले
दोन दिवसात उच्चांकी पावसाने तालुक्याला झोडपले आहे. ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली आहे. या पावसाने सर्वच ओढे, धबधबे खळखळून वाहत असून नद्या-नाल्यांना पूर आले आहेत. ठिकठिकाणचे रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने अघोषित रास्ता रोकोचे प्रमाण वाढले आहे. शेतात सर्वत्र पाणीच पाणी असून जमीनी उपळल्या आहेत. खरीप वाया जाण्याच्या मार्गावर असून परिसरावर ओल्या दुष्काळाचे सावट घोंगावत आहे.