राहुरी (प्रतिनिधी) – विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे महात्मा फुले कृषी विद्यापीठात कुलगुरूंच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी कुरगुरूंनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल खपके, सचिन शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात 2020-21 मध्ये महाविद्यालयाच्या एकूण शुल्कापैकी 30 टक्के शुल्क कपात करण्यात यावेत, शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये प्रमोट करण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे, कोणत्याही विद्यार्थ्यावर फी भरण्यासाठी दबाव आणला जाऊ नये, विद्यार्थ्यांना कमीत कमी 4 हप्त्यांमध्ये फी भरण्याची मुभा द्यावी, 24 मार्चपासून होस्टेल बंद झाल्यामुळे विद्यापीठ सलग्न महाविद्यालयांना 4 महिन्यांचे वसतिगृह शुल्क तत्काळ परत करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य कोमल राजपूत, संगमनेर शहरमंत्री सिद्धेश सोमाणी, श्रीरामपूर शहरसहमंत्री गौरव चांदर व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. कुलगुरूंनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.