कोपरगाव(प्रतिनिधी) – कोल्हे परिवाराने संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून करोना बाधित रुग्णासाठी आत्मा मालिक संस्थेच्या सहाय्याने गरजू व गरीब रुग्णांच्या सेवेसाठी संजीवनी कोव्हीड सेंटर हे सर्व सुविधांनी युक्त उत्तम व्यवस्था उभी केली ही सुविधा बधितांसाठी लाभदायक असून बाधितांना मोठी मदत होत असल्याचे समाधान देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करून कोल्हे परिवाराचे कौतुक केले.
सोमवारी(दि १७ मे) कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या संजीवनी कोव्हीड केअर सेंटरला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी तिनच्या दरम्यान भेट देऊन ऑक्सिजन बेड विभागाचे उदघाटन केले.
यावेळी त्यांच्या समवेत भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,आत्मा मालिक ध्यानपीठाचे संत परमानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी , तहसीलदार योगेश चंद्रे,भाजपचे डॉ राजेंद्र पिपाडा,शरद थोरात, वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर , सचिन तांबे, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे,पराग संधान ,कार्यकारी संचालक शिवाजी दिवटे आदी उपस्थित होते.
यावेळी फडणवीस यांनी संजीवनी कोविड सेंटरच्या ऑक्सिजन बेड विभागाची पहाणी करून कार्यकर्त्यांशी संवाद साधला तसेच आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर व इतर सेवकांशी संवाद साधला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले की,करोनाच्या या संकटात राज्य सरकार आपले अपयश झाकण्याकरिता सतत केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याची सवय लागली आहे.त्यांनी कधी तरी आपले आत्मचिंतन करून अश्या काळात आपण काय केले पाहिजे असा विचार करावा. हे संकट कोणत्या एका पक्षाचे नाही. सर्वांनी मिळून काम केले पाहिजे मात्र चांगले काम झाले तर स्वतःची पाठ थोपटून घेतली जाते, अन अडचणीत असले की केंद्राकडे बोट दाखविले जाते अशी राज्याची भूमिका योग्य नाही. सध्याचा हा काळ टीका टिप्पणी किंवा कुरघोडही करण्याचा नसून एकमेकांना संभाळून लोकांना कशी मदत करता येइल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
भाजपचे कार्यकर्ते सेवा हीच संघटन हे सूत्र बाळगून या संकट काळात नागरिकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत केंद्र व राज्य सरकार आपापल्या पद्धतीने प्रयत्न करीत असले तरी त्यात भाजपचे लोक अधिक मदत करत आहे. म्हणुनच कोल्हे परिवाराने संजीवनी कोविड सेंटरच्या माध्यमातून मदत करत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
वेळेत टेंडर झाले पाहिजे आणि शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे
२०१९ पासून पंतप्रधान पीक विमा मिळाला नाही याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले राज्य सरकारने टेंडर काढले नाही. जे काढले ते उशिरा काढले, राज्यातील अनेक जिल्ह्यातील टेंडर झलेच नाही अश्यात पिकांचे निकष बदलले. त्यामुळे तिथे टेंडर झाले नाही म्हणून अनेकांना विमा मिळाला नाही. योजना सुरू झाल्यापासून सर्वात जास्त पैसे राज्याला मिळाला. मात्र निकष बदलल्याने पैसे आपल्या खिशातून जात आहे. म्हणून शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही, म्हणून वेळेत टेंडर झाले पाहिजे आणि शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे.
दरम्यान, विवेक कोल्हे यांनी संजीवनी कोविड सेंटरमध्ये करोना बाधित रूग्णांसाठी सुरू असलेल्या सुविधांची माहिती देऊन फडणवीस यांच्याकडे विविध समस्यांची मांडणी केली.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांची कोल्हे कारखाना स्थळावर जावून भेट घेवून त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली.