नगर – केंद्र सरकारच्या दृष्टीने महत्वकांक्षी योजना म्हणून ठरलेल्या जलजीवन मिशन योजनेत जिल्ह्यात तब्बल 901 पाणीयोजना येत्या दोन वर्षात उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात ‘हर घर नल, हर घर जल’ या योजनेच्या बीद्रवाक्याप्रमाणे पाणी पोहचविण्यासाठी हे मिशन यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग गेल्या काही दिवसांपासून दिवसरात्र काम करीत आहे. मात्र कमी मनुष्यबळात हे मिशन पूर्ण करण्यासाठी उपअभियंता व शाखा अभियंत्यांना कसरतच करावी लागत आहे.
एक हजार कोटीहून अधिक निधी येत्या दोन वर्षात खर्च करून 901 स्वतंत्र पाणीयोजना पूर्ण करायच्या आहेत, पण त्यासाठी अवघे 15 अभियंते या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे आहेत.
गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेत नव्याने भरती न झाल्याने आहे त्या अधिकारी व कर्मचार्यांमध्ये कामकाज करावे लागत आहे. दिलेल्या मुदतीत काम करतांना या अधिकारी व कर्मचार्यांची चांगलीच दमछाक होते. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची सध्या तरी कमी मनुष्यबळामुळे दयनीय अवस्था झाली आहे. कामांचा डोंगर उभा असतांना आहे त्या अधिकारी व कर्मचार्यांमध्ये काम करणे अवघड झाले आहे. केंद्र व राज्य यांच्या प्रत्येकी 50 टक्के भागीदारीतून ही योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 644 स्वतंत्र पाणीयोजनांना मंजूरी मिळाली होती. आता नव्याने 257 योजनांना मंजूरी देण्यात आली आहे. याप्रमाणे 901 पाणीयोजना जिल्ह्यात होणार आहे. जिल्ह्यात 901 पाणीयोजनांमुळे 1 हजार 5 गावांमधील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी मिळणार आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे 901 तर महाराष्ट्र जीवन प्रधिकरणाकडू 86 योजना आहे. जीवन प्रधिकरणाकडे पाच कोटी रूपये खर्चाच्या पुढील योजनांचा समावेश आहे. या 86 पाणीयोजनांमुळे 577 गावांना पाणी मिळणार आहे. तब्बल एक हजार कोटी रुपये खर्चाचे ही जलजीवन मिशन राबविण्यासाठी अवघे 15 अभियंते आहेत. त्यात चार उपअभियंता व 11 शाखा अभियंत्यांचा समावेश आहे. या अभियंत्यांकडे पाणीपुरवठा विभागासह लघु पाटबंधारे विभागाचे कामे पाहण्याची देखील जबाबदारी आहे. काही तालुक्यात तर बांधकाम, पाणीपुरवठा व लघु पाटबंधारे या तिन्ही भागांंची जबाबदारी एक शाखा अभियंत्यावर आहे. एवढया तोकड्या अभियंत्यांच्या जीवावर ही योजना राबविण्याचा प्रयत्न हा विभाग करीत आहे.
दोन उपअभियंत्यांकडे कार्यकारीचा पदभार
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे सात उपविभाग असून त्या ठिकाणी सध्या चार उपअभियंता व 11 अभियंता आहे. प्रत्यक्षात 14 उपअभियंता व 39 शाखा अभियंत्यांची पदे मंजूर आहेत. मात्र भरती झाल्यामुळे हे पद रखडली आहेत. जे काही चार उपअभियंता आहे. त्यापैकी दोन उपअभियंत्यांकडे कार्यकारी अभियंताचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे या अभियंत्यांना हे काम सांभाळून मुळ पदाचे काम पहावे लागत आहे.