कर्जत (प्रतिनिधी) – शहरातील मुख्य रस्त्यावरील दुतर्फा असणाऱ्या गाळेधारकांना रस्ता रुंदीकरणमध्ये विस्थापित होण्याची वेळ आली आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून येथे व्यवसाय करणाऱ्या, उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांच्या रोजीरोटी जाऊ नये, यासाठी बाह्यवळण रस्त्याचा पर्याय सुचवण्यात आला असून खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागाला पर्यायी बाह्यवळण रस्त्याचे सर्वेक्षण व आखणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार रस्त्याचे सर्वेक्षण सुरू होईल व गाळेधारकांच्या डोक्यावरची टांगती तलवार कायमची दूर होईल.
नगरपंचायत हद्दीतील अक्काबाई नगर ते दादा पाटील महाविद्यालय पर्यंतचा रस्त्याच्या बाजूला गाळेधारक सुमारे पन्नास वर्षापासून व्यवसाय करीत आहेत. 1996 -97 मध्ये हा रस्ता रुंदीकरण करतेवेळी एसटी बसस्थानकाच्या संरक्षण भिंतीलगत असणाऱ्या दुकानाची रांग तत्कालीन मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जैसे थे ठेवण्यात आली होती. आजपर्यंत या अल्प उत्पन्न गाळे धारकांची उपजीविका सुरू आहे.
गाळे जमीनदोस्त झाले तर सुमारे 300 पेक्षा जास्त गाळेधारक आणि त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर येतील. ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन खासदार डॉ. सुजय विखे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला बाह्यवळणं रस्ताचे प्रस्ताव तयार करण्यासाठी सूचना केली. बाह्यवळण रस्ता बाबतची प्रथम माहिती हाती आली असून गायकर वाडी, जामदार वाडी ते खंडाळा असे सुमारे 43 किलोमीटरचे बाह्यवळण रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे.
सुमारे वीस वर्षापूर्वी तत्कालीन मंत्री असताना आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी गाळेधारकांना विस्थापित करण्यापासून प्रशासनाला रोखले होते व त्यानंतर आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढताना प्रस्तावित 43 किलोमीटरच्या बाह्यवळण रस्त्यासाठी पाठपुरावा केला आहे.