-शंकर दुपारगुडे
कोपरगाव (प्रतिनिधी) : कोपरगाव शहरात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थींच्या घरांच्या बांधकामाला गेल्या दोन वर्षापासून निधी न मिळाल्याने शेकडो घरे अर्धवट अवस्थेत अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. शासनाकडून तब्बल 6 कोटी 14 लाख 40 हजार रूपयांचा घरकुल निधी लाभार्थ्यांना मिळणे बाकी असल्याने नागरीकांची घरकुले अर्धवट स्थितीत आहेत.
शासनाच्या निष्काळजीपणामुळे सर्वसामान्य नागरीकांच्या स्वप्नातील घरं अपुर्ण असल्याने हक्काचे पक्के घर बांधण्याचे स्वप्न ते स्वप्नच राहिले आहे. शहरात सन 2017 पासुन घरकुल अनुदानाची पुर्ण रक्कम लाभार्थ्यांना न मिळाल्यांने आर्थिक अडचणीचा सामना करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत शहरातील नागरिकांना घरकुल बांधकामासाठी अडीच लाख रुपयांचा आर्थिक लाभ शासनाच्या वतीने दिला जातो. त्यात राज्य सरकारकडून एक लाख तर केंद्र सरकार कडून दिड लाखाचा सामावेश असतो.
कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून घरकुल योजनेसाठी कार्यारंभ सुरु केला असता.सन 2017 मधील पहील्या यादीत 211 नागरीकांचे घरकुल अर्ज मंजुर झाले त्यापैकी 140 लाभार्थींनी प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली. त्यांना 1 लाखा प्रमाणे 2 कोटी 11 लाख रू. मिळाले तर केंद्र शासनाकडून 60 लाखा प्रमाणे फक्त 1 कोटी 26 लाख 60 हजार रुपये लाभार्थींना मिळाले. पैसे मिळु लागले म्हणून लाभार्थींनी घरकुलांचे बांधकामे जोरात सुरू केले तर इतरांनी घरकुलासाठी अर्ज दाखल केले.
सन 2019 मध्ये दुसऱ्या यादीत 68 नागरिकांना मंजुरी मिळाली त्यात 35 लाभार्थींनी प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात केली. तिसऱ्या आदीत 215 अर्ज मंजूर झाले त्यात 100 लाभार्थींनी घरांच्या बाधकामाला सुरुवात केली. पुन्हा चौथ्या यादीत 96 लोकांना घरकुलाची मंजुरी मिळाली. अशाप्रकारे आत्तापर्यंत एकुण 494 घरकुलांना मंजुरी मिळाली त्यांना राज्य शासनाचे एक लाखाचे अनुदान मिळाले मात्र केंद्राचा उर्वरित आर्थिक लाभ लाभार्थींना झाला नसल्याने घरकुलांची कामे रखडली असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली आहे.
90 लाभार्थींनी अनुदानित पैशावर विसंबून न राहता स्वतः कर्ज काढुन घराचे बांधकाम पुर्ण केले तर 290 लाभार्थीं घरकुलाचा निधी मिळविण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करीत आहेत. शासनाकडून पालिकेकडे 6 कोटी 14 लाख 40 हजाराचा घरकुल निधी मिळविण्यासाठी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व बांधकाम विभागाचे प्रभारी अभियंता हर्षवर्धन सुराळकर अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत आहेत मात्र महाडाचे प्रमुख चालढकल करीत उडवाउडवी करीत असल्याची खंत पालिका प्रशासनाने व्यक्त केली.
सध्या शहरात 243 लाभार्थींच्या घराचे बांधकाम सुरु आहे मात्र घरकुलाचे पैशे मिळत नसल्याने अनेकांच्या घराचे बांधकाम अर्धवट अवस्थेत पडून आहे. काहींनी कर्ज काढून बांधकाम सुरू केले. लाभार्थींना जर वेळेत घरकुलाचे पैसे नाही मिळाले तर त्यांच्या सर्व स्वप्नावर पाणी फिरुन घर बांधण्याच्या नादात डोक्यावर कर्जाचा डोंगर उभारण्याची भिती अनेकांनी व्यक्त केली आहे.
शासनाच्या उदासीनतेमुळे काहींनी मंजूर झालेले घरकुलाचे बांधकाम सुरू केले नाही. तर कांहीनी सुरूवातीचा हप्ता घेवून बांधकामाचा पाया भरुन घेत पुढे बांधकाम केले नाही. अर्धवट बांधकाम काहींचे असल्याने त्यांना पुढचा आर्थिक लाभ मिळत नाही तर काहींनी बांधकाम पुर्ण केले मात्र इतरांच्या अर्धवट बांधकामाचा फटका इतरांना बसत आहे. तेव्हा नागरीकांनी घरकुलाचे बांधकाम पुर्ण करुन पालिका प्रशासनाला सहकार्य केल्यास उर्वरित अनुदान मिळण्यास विलंब लागणार नाही. लाभार्थींना आर्थिक लाभ देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पालीकेच्या वतीने विषेश प्रयत्न सुरु असून लाभार्थींनी अपुर्ण बांधकाम नियमात पुर्ण करीत सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी सरोदे यांनी केले.