उभी पिके भूईसपाट : पंचनामे करण्याच्या आमदार काळेंच्या सूचना
कोपरगाव (प्रतिनिधी) – कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागात रविवारी (दि.6) दुपारी झालेल्या वादळी वारा व मुसळधार पावसामुळे उभी पिके भुईसपाट झाली. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे व तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांना केल्या आहेत.
कोपरगाव तालुक्यातील करंजी, पढेगाव, कासली, शिरसगाव, तिळवणी, तळेगाव मळे, दहेगाव, लौकी, धोत्रे, खोपडी, भोजडे आदी गावांना वादळी वाऱ्याचा व मुसळधार पावसाचा रविवारी दुपारी तडाखा बसला. या पादळी पावसाने शेतातील ऊस, मका, कपाशी, कांदा रोपे, बाजरी, तूर आदी उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. सुमारे दोन तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली. या वादळी पावसाचा फटका काढणीला आलेली बाजरी, मका, तूर, कपाशी या पिकांना बसला. शेतातील ही पिके झोपली आहेत.
करोनाच्या संकटात देखील शेतकऱ्यांनी उसनवारी करून शेतात पेरणी केली होती. वेळेवर पाऊस झाल्यामुळे सर्वच पिके जोमात होती. मात्र झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे स्वप्नच उद्ध्वस्त करून टाकले. या वादळी पावसामुळे मोठमोठी झाडे उन्मळून पडली असली, तरी सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. शेतीच्या झालेल्या नुकसानीची माहिती मुंबई येथे अधिवेशनासाठी गेलेल्या आमदार काळे यांना समजताच त्यांनी भ्रमणध्वनीवरून तहसीलदार चंद्रे, तालुका कृषी अधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी धोत्रे परिसरात ढगफुटी होवून मोठे नुकसान झाले होते. या जखमा ताज्या असतानाच आज पुन्हा धोत्रे व परिसराला वादळी पावसाने झोडपल्यामुळे शेतकरी कोलमडून पडला आहे.नुकसानीबाबत आपण मदत, पुनवर्सन खात्याच्या मंत्र्याशी संपर्क करून झालेल्या नुकसानीची माहिती त्यांना दिली. शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू, असे आमदार काळे यांनी सांगितले.