कोपरगाव (प्रतिनिधी) – कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावांना पुन्हा एकदा वादळी वाऱ्याचा व अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. त्यामुळे केवळ पंचनामे करून कागदपत्रे रंगविण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई बिपिन कोल्हे यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
तालुक्यातील खोपडी, लौकी, कान्हेगाव, संवत्सर, भोजडे, धोत्रे, आपेगाव, कासली, शिरसगाव, गोधेगाव, दहेगाव बोलका, पढेगाव, करंजी, खिर्डी गणेश आदी गावांना अतिवृष्टी आणि वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन, मका, बाजरी आदी पिकांबरोबर ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी कोल्हे यांनी आज केली. यावेळी माजी तालुकाध्यक्ष शरदराव थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम उपस्थित होते.
सोंगणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. विविध संकटांवर मात करत उभी केलेली पिके अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे. त्यामुळे केवळ पंचनामे करून कागदपत्रे रंगविण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी कोल्हे यांनी केली. ज्या शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविलेला आहे, त्यांनी झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी तालुका कृषी कार्यालयात लेखी अर्ज सादर करावेत, असे यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
हजाराचा धनादेश, तोही वर्षे सहा महिन्यांनी
15 दिवसांच्या अवधीनंतर हातात येणारा घास डोळ्यांदेखत जमीनदोस्त होतो. गेल्या चार महिन्यांपासून जीव ओतून जोपासना केली. जोमात आलेली पिके अचानक आलेल्या पावसामुळे उद्ध्वस्त होतात. चार महिन्यांच्या कष्टावर अक्षरशः पाणी फिरले. नेहमीप्रमाणे पंचनामे करण्याचा घाट घालून वर्ष, सहा महिन्यांनी लाखाच्या नुकसानापोटी हजाराचा चेक हातात येतो. ही जगाच्या पोशिंद्याची अवस्था आहे. हे सरकार शेतकऱ्यांचेच काय पण कोणाच्याच हिताचे नाही.
संतोष देशमुख,शेतकरी