कोपरगाव (प्रतिनिधी) –करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा गणेशोत्सव सर्व नागरिकांनी साध्या पद्धतीने साजरा केला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन करताना कर्दी होऊन गणेश भक्तांना करोनाची बाधा होऊ नये, यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील नागरिकांना विसर्जन रथ उपलब्ध करून दिला. तसेच परमार्थाकडून पर्यावरणाकडे, असा आगळावेगळा संदेश दिला.
यावर्षी मार्च महिन्यापासून सर्वच सण साजरे करताना करोना संकटामुळे मर्यादा आल्या आहेत. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून सर्व जाती-धर्मांचे नागरिक आपल्या परंपरेनुसार धार्मिक सण-उत्सव साजरे करत आहेत. या सण-उत्सवांतून गणेशोत्सव देखील सुटला नाही. त्यामुळे प्रत्येक गणेश भक्ताला यावर्षी आपल्या भावनांना मुरड घालून अतिशय साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा लागला आहे. मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आल्यानंतर करोनाची बाधा होण्याचा धोका जास्त असतो, हे ओळखून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना गणेश भक्तांना करोनाची बाधा होऊ नये, यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी परमार्थाकडून पर्यावरणाकडे, या उद्देशातून विसर्जन रथ उपलब्ध करून दिला.
या विसर्जन रथाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी गणेश भक्तांच्या घरी जावून गणेश मूर्ती जमा करून कोपरगाव नगरपरिषदेकडे दिल्या. कोपरगाव नगरपरिषदेने या गणेश मूर्तींचे विधिवत पूजन करून तयार करण्यात आलेल्या विसर्जन हौदात त्यांचे विसर्जन करणार आहे. या विसर्जन हौदामध्ये अमोनियम बायकार्बोनेट रासायनिक द्रव्य पदार्थांचा वापर करून या मूर्ती विरघळवण्यात येणार आहेत. त्यामुळे दरवर्षी तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या गोदावरी नदीचे गणेश मूर्तीसाठी वापरले जाणारे पीओपी व मूर्तीच्या रंगातील विषद्रव्य पाण्यात मिसळून पाण्यातील जलचर होणाऱ्या बाधेपासून वाचणार असून, मूर्ती विसर्जनामुळे मोठ्याप्रमाणात गोदावरी नदीचे होणारे प्रदूषण टाळले जाणार आहे.
याप्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, गटनेते नगरसेवक वीरेन बोरावके, मंदार पहाडे, सुनील शिलेदार, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, डॉ. तुषार गलांडे, फकीर कुरेशी, गणेश लकारे, संदीप देवळालीकर, चंद्रशेखर म्हस्के, उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, बांधकाम अभियंता दिगंबर वाघ आदी उपस्थित होते.