नगर (प्रतिनिधी) – करोना विषाणूचा जिल्ह्यात कहर सुरूच असून, आज तब्बल दोन हजार 405 इतके रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. करोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सर्वोतरी प्रयत्न करीत असले, तरी रुग्णसंख्या वाढतच आहे. परिणामी ऑक्सिजन बेड, रेमडेसिविर रुग्णांना मिळणे अवघड झाले आहे.
वीकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केवळ सोमवारी रुग्णसंख्या थोडीसी कमी झाल्याचे आढळून आले होते. सोमवारी 1 हजार 652 नवे रुग्ण आढळून आले होते. मात्र, आज पुन्हा रुग्णसंख्येने नवीच मुसंडी मारल्याने उपाययोजना करण्यात जिल्हा प्रशासन हतबल होताना दिसून येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री राज्यातील संचारबंदीचा आदेश जारी केला. तथापि, त्याच्या अंमलबजावणीसाठी रात्री उशिरापर्यंत प्रशासनाचे काय तयारी केली? याची माहिती समोर आली नव्हती. रात्री उशिरापर्यंत अधिकारी केवळ बैठकांत व्यस्त होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार नगरमध्ये संचारबंदीची कशी अंमलबजावणी होईल, याची माहिती जिल्हा प्रशासन रात्री उशिरापर्यंत देऊ शकले नाही.
संचारबंदी जाहीर करताना राज्य सरकराने काही घटकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश केलेला आहे. मात्र, या अगोदर जाहीर केलेल्या निर्बंधानुसार त्यांनाही रात्री आठपयर्र्ंतच रस्त्यावर थांबता येईल. त्यानंतर मुभा दिलेल्या घटकांनाही संचारबंदीचा नियम लागू असेल, असे खासगीत काही अधिकार्यांनी सांगितले. तथापि, या नियमासंदर्भात रात्री उशिरापर्यंत प्रशासन काहीही प्रेसनोट देऊ शकले नाही. त्यामुळे नागरीक व माध्यमांचाही संभ्रम कायम होता.