गावातील कृषी क्षेत्राशी संबंधित किमान 12 व्यक्तींची समिती
कामशेत – गावातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी गावामधील नैसर्गिक साधनसंपतीचा जास्तीत जास्त उपयोग करणे, विविध योजना व प्रकल्प यामधून हाती घ्यायच्या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 49 (4) नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषिविकास समिती स्थापन करण्यात यावी व या समितीमध्ये गावातील कृषी व संलग्न क्षेत्राशी संबंधित असलेल्या किमान 12 व्यक्तींचा समावेश असेल तथापि त्यातील अर्धापेक्षा कमी नाही एवढे सदस्य महिला प्रवर्गातील असतील, ग्रामकृषी विकास समितीची रचना गावातील सरपंच पदसिद्ध अध्यक्ष असतील तर उपसरपंच पदसिद्ध सदस्य असतील व अन्य सदस्यांची निवड पुढील घटकांमधून करण्यात येईल.
ग्रामपंचायत सदस्यांपैकी एक समितीचा सदस्य गावातील तीन प्रगतशील शेतकरी त्यातील एक महिला सदस्य, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष (1), शेतकरी उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गटाचे प्रतिनिधी, महिला बचत गट प्रतिनिधी. कृषी पूरक व्यावसायिक शेतकरी 2, तलाठी हे सदस्य असतील, तर कृषी सहाय्यक सहसचिव व ग्रामसेवक सदस्य सचिव असतील.
ग्राम कृषिविकास समितीची मुदत ही ग्रामपंचायतीच्या मुदती इतकीच असेल तसेच नवीन ग्रामपंचायत गठीत झाल्यापासून 45 दिवसांत ग्राम कृषि विकास समिती संबंधित ग्रामपंचायतीत गठीत करण्यात येईल.
पदसिद्ध सदस्याशिवाय अन्य सदस्यांची नियुक्ती ग्रामसभेच्या मान्यतेने करावी, पदसिध्द तांत्रिक सदस्य व निमंत्रितास मतदानाचा अधिकार असणार नाही. समितीच्या अध्यक्षांचा कालावधी हा त्यांच्या सरपंच पदाच्या कालावधी एवढा राहिल तसेच ग्रामसमितीचे सदस्य यांचा कालावधीही त्यांच्या सदस्यपदाच्या कालावधी एवढाच राहिल नवीन ग्रामपंचायत गठीत झाल्यावरआधीच्या समितीचे सदस्य म्हणून कार्य केलेल्या व्यक्ती समितीच्या सदस्यपदी निवडण्यास पात्र ठरत असतील तर त्यांची पुर्ननियुक्ती करता येईल.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 49 अंतर्गत ग्रामसभेने समिती स्थापन करण्याची कार्यवाही करावी. ग्राम विकास समित्यांच्या संबंधातील तरतुदी या समितीस देखील लागू राहतील.
अशी असतील समितीची कार्य
– ग्रामसेवक यांनी कृषी सहाय्यकाच्या समन्वयाने समितीच्या बैठ्कीचे आयोजन करून कामकाज करावे.
– या समितीची सभा महिन्यातून किमान एकदा होईल.
– शासनाच्या कृषी विषयक सर्व योजना ग्रामपंचायत क्षेत्रात प्रभावी पाने राबविण्यासाठी प्रसार करणे.
– शासनाच्या योजनांचा नियमितपणे आढावा घेऊन लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणे.
– ग्रामीण स्थरावरील हवामान, पाऊस, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा पोत आदी बाबी लक्षात घेऊन ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या पीक लागवडी संबंधित नियोजन करणे व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे.
– कार्यक्षेत्रातील जलसंधारणाच्या मर्यादा लक्षात घेऊन कमी प्रजन्यमान असलेल्या ठिकाणी दर्जेदार पीक उत्पादन कसे घेता येईल, या बाबतीत समिती काम करेल.
– आधुनिक तंत्रज्ञान, बियाणे, खते व अन्य कृषि निविष्ठा, एकात्मिक कीड नियंत्रण, एकात्मिक पोषण व्यवस्थापन, यांत्रिकीकरण, संरक्षित शेती, फळबाग लागवड या विषयावर मार्गदर्शन करणे.
– शेतीपूरक व्यवसाय दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन, शेळी पालन, रेशीम लागवड आदी शेतीपूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन करणे
– पीक काढणी तंत्रज्ञान व विक्रीसाठी बाजारपेठा याबाबत मार्गदर्शन करणे.