स्नोलेपर्डचे संवर्धन करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मत : किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवानिमित्त वार्तालाप
पर्यावरणीय समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ : चुकीच्या पाणी व्यवस्थापनामुळे टंचाई
पुणे – शेतीला पूरक अर्थव्यवस्था निर्माण करायला हवी, असे मत लेह-लडाख येथील “शान-ए-शान’ अर्थात स्नोलेपर्डचे संवर्धन करणारे कार्यकर्ते खेनरब फुन्तसोग, ताशी त्सेरींग आणि स्मानला त्सेरींग यांनी व्यक्त केले.
14 व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त यंदाच्या ग्रीन टिचर सन्मानाचे मानकरी सोलापूर येथील डॉ. श्रीनिवास वडगबाळकर आणि “शान-ए-शान’ यांच्या विशेष वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सागरमित्रचे विनोद बोधनकर, बायोस्फिअर्सचे डॉ. सचिन पुणेकर आणि सुप्रिया चित्राव आदी उपस्थित
होते. वार्तालापावेळी ते बोलत होते.
शेती आणि शेळीपालन हे लेह-लडाखमधील उत्पन्नाचे एकमेव साधन होते आणि स्नोलेपर्ड ही डोकेदुखी ठरली होती. शेतकऱ्यांच्या शेळ्यांवर स्नोलेपर्डने हल्ले करण्याचे प्रमाण खूप वाढल्याने स्नोलेपर्ड ही एक समस्या बनली होती. कालंतराने स्नोलेपर्डचे संवर्धन आणि पर्यटन याची योग्य सांगड घालत या समस्येवर तोडगा काढण्यात आला. आता खास स्नोलेपर्ड बघण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर इकडे येतात. यातून शेतीला पूरक अर्थव्यवस्था निर्माण करता आली, असे त्यांनी सांगितले.
चुकीच्या पाणी व्यवस्थापनामुळे खेड्यापाड्यांवर पाणी प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रत्येक सजीवाच्या चाऱ्या-पाण्याची सोय निसर्गाने केलेली आहे; परंतु विकास प्रकल्प राबवताना अभ्यासूवृत्तीच्या अभावामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सुमारे 460 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली आणि सुमारे एक ते दीड लाख वर्षांपासून मानवाचे पृथ्वीवर अस्तित्व आहे; परंतु मानवाच्या योग्य नियोजनाच्या अभावामुळे आणि निसर्गाच्या हातात हात घालून विकास करण्याच्या प्रयत्नात आलेल्या अपयशामुळे पर्यावरणीय समस्या उद्भवत आहेत, असे मत ज्येष्ठ भूजलशास्त्र तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास वडगबाळकर यांनी व्यक्त केले.