नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे मित्र असलेल्या काही अब्जाधीशांच्या लाभासाठीच केंद्र सरकारने तीन कृषी कायदे आणले आहेत, असा आरोप कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केला आहे.
प्रियांका गांधी यांनी अडानी समूहाने हिमाचल प्रदेशातील सफरचंद खरेदीची रक्कम किलोमागे सोळा रुपयांनी घटवल्याच्या बातमीचाही दाखला या अनुषंगाने दिला आहे. त्या म्हणाल्या की, शेतमालाच्या किंमती ठरवण्याचे अधिकार अशा मोठ्या भांडवलदारानां मिळाले तर असेच घडणार आहे.
कृषी मालाचे भाव भाजपच्या अब्जाधीश मित्रांनाच ठरवण्याचे अधिकार मिळावेत यासाठीच नवे कृषी कायदे आणण्यात आले आहेत, असा आरोपही प्रियांका गांधी यांनी आज ट्विटरवर केला. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या मालाचा दर ठरवण्याचा अधिकार या अब्जाधीश मित्रांच्या हातात जाताकामा नये, असेही त्यांनी म्हटले आहे.