पुणे – बॅंक ऑफ महाराष्ट्रने अभियान कालावधीत आपले लक्ष्य साध्य केल्याबद्दल केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रीनरेंद्र तोमर यांच्या हस्ते कृषी पायाभूत सुविधा निधी पुरस्कार प्रदान करण्यात आला. बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या कृषी, वित्तीय विभाग व राज्य अग्रणी बॅंक समिती विभागाचे सरव्यवस्थापक विजय एन कांबळे यांनी बॅंकेच्या वतीने सदर प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारला.
नवी दिल्ली येथील पुसा मार्गावरील एन ए एस संकुलातील ए पी शिंदे सभागृहात सदर पुरस्कार समारंभ पार पडला. दूरदृष्टीने आखलेल्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेद्वारे कृषी विषयक पायाभूत सुविधांचे देशातील चित्र अमुलाग्र बदलण्याचा सरकारचा प्रयत्न असून शेतकरी, कृषी उद्योजक, उद्योग, कृषी उत्पन्न बाजार समित्या, स्वयंसहाय्यता गट ,शेतकरी उत्पादक संघटना इत्यादी शेतकरी गटांना अर्थसहाय्य देऊन त्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती अधिक उत्तम करण्याचा प्रयत्न आहे.
सूक्ष्म व छोट्या उद्योगांच्या पतहमी निधी (सीजीटीएमएसई) कडून व्याज अनुदान व पत हमीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या पाठबळाने व्यवहार्य उपजोत्तर व्यवस्थापनासाठी पायाभूत व सामुदायिक कृषी सुविधा निर्माण करण्यासाठी मध्यम व दीर्घ मुदतीची वित्तीय सहाय्य सुविधा देण्याचा कृषी पायाभूत सुविधा निधीद्वारे प्रयत्न आहे.