मुंबई – केंद्र सरकारने जो कृषी कायदा आणला आहे त्याबाबत सर्व संबंधितांशी, शेतकरी संघटनांशी चर्चा करण्यात येत आहे. कृषी कायद्याचे फायदे आणि तोटे विचारात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच विविध भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाकरे म्हणाले, निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना आपण मदत केली आहे. विदर्भात अतिवृष्टीने जे नुकसान झाले त्यांना मदत करण्यासाठी निधी मंजूर केला आहे. आता सतत पडणाऱ्या पावसानेही पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी चिंता न करता निश्चित राहावे, शासन त्यांना त्यांची नुकसानभरपाई देईल.
राज्य सरकारने तब्बल 29.5 लाख शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. खरंतर, कोकण आणि पूर्व विदर्भात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यांना सागली-कोल्हापूरप्रमाणे नुकसान भरपाई देत आहोत. काही ठिकाणी संततधार पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. त्या ठिकाणीदेखील नुकसान भरपाई दिली जाईल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
तसेच “जे विकेल, तेच पिकेल’ ही योजना शासनाने राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती सुरु केली असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, हमीभाव नाही तर पिकांना हमखास भाव मिळेल.
यादृष्टीने शेतकरी आणि बाजारपेठ यामध्ये सांगड घातली जाणार आहे. तसेच राज्यात “महाओनियन’चे सहा प्रकल्प सुरु केले आहेत. केवळ कांद्यांसाठीच नाही तर कापूस, तूर, मुग अशा विविध शेतपिकांसाठी साठवणूक आणि कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
शिवभोजनच्या 2 कोटी थाळ्यांचे वितरण
महाविकास आघाडी सरकारने गरिबांसाठी स्वस्तात जेवण देण्यासाठी “शिवभोजन थाळी’ ही महत्वपूर्ण योजना आणली. याला करोनाच्या काळात गरीब जनतेला सर्वाधिक फायदा झाला. या काळात 2 कोटी 2 लाख शिवभोजन थाळी वितरीत झाली, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री म्हणाले, शिवभोजन थाळी ही मूळ योजना 10 रुपयांत थाळी अशी होती. ती करोनाच्या काळात आपण 5 रुपयांत थाळी अशी केली असल्याचे त्यांनी सांगितले.