राहुरी – आता पूर्वीसारखी शेती राहिलेली नाही. शेतीसमोर माती, प्रदुषित पाणी व वातावरण बदलासारखे मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यावर उत्तर शोधण्याची जबाबदारी कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांची आहे. राज्यातील कृषि विद्यापीठांनी विविध पिकांमध्ये संशोधन करुन नवनवीन वाण तयार केले आहेत. ही एक प्रकारे त्यांनी संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची केलेली सेवा असून कृषि शास्त्रज्ञ हे शेतीचे खरे सैनिक असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विद्यापीठात तीन दिवसीय संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीची 51 वी बैठकीचे उद्घाटन झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरुन मंत्री सत्तार बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन पोकराचे प्रकल्प संचालक डॉ. परिमलसिंग उपस्थित होते.
स्वागताध्यक्ष म्हणुन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील उपस्थित होते. यावेळी कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्थेचे संचालक डॉ. आर.ए. मराठे, तीनही विद्यापीठांचे कुलगुरु डॉ. संजय सावंत (दापोली), डॉ. इंद्र मणी (परभणी), डॉ. शरद गडाख (अकोला), कार्यकारी परिषद सदस्य गणेश शिंदे उपस्थित होते.
मंत्री सत्तार म्हणाले, की चारही कृषि विद्यापीठांनी बियाणे निर्मितीमध्ये उच्चांक केला असून त्यामुळे शेतकऱ्यांना बियाण्यांचा पुरवठा करतांना अडचण येणार नाही. सर्व शास्त्रज्ञांचे काम हे शत्रू सैन्याबरोबर लढाई करणाऱ्या सैनिकांइतकेच मोठे आहे. कृषि विद्यापीठांना संशोधनासाठी 100 कोटी रुपयांचे अनुदान वितरीत केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विद्यापीठातील चार शास्त्रज्ञांना उत्कृष्ट शास्त्रज्ञ पुरस्कार कृषि मंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये महात्मा फुलेतील वनस्पतीशास्त्र विषयातील प्राध्यापक डॉ. पवन कुलवाल, अकोलातील डॉ. रामेश्वर कुऱ्हाडे, परभणीचे डॉ. दिपक पाटील व दापोलीच्या डॉ. भरत वाघमोडे यांचा समावेश होता.